आम्हाला नुकसानभरपाई कधी मिळणार?

शेतकर्‍यांचे तहसीलदारांना निवेदन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात मे 2024मध्ये चक्री वादळ आले होते. त्यावेळी तालुक्यातील अनेक गावांमधील घरांचे नुकसान झाले होते, मात्र त्यातील एकाही नुकसान ग्रस्तांना शासनाने मदत केलेली नाही. दरम्यान, मे 2024 मध्ये नुकसान ग्रस्त ठरलेल्या शेतकर्‍यांना शासनाने नुकसान भरपाई दिली नसल्याने आंबिवली गावातील शेतकर्‍यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन मागणी केली. शासनाने दखल न घेतल्यास शेतकर्‍यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे.

दि. 14 मे 2024 रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सायंकाळी पाचच्या सुमारास चक्रीवादळ येथून मोठ्या प्रमाणात गारांचा (गारपिटी) पाऊस पडला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात वारे वाहत होते आणि त्यांचा फटका करीत तालुक्यातील अनेक गावांना बसला. त्यावेळी वारा आणि पाण्याचा जोर इतका होता की ग्रुप ग्रामपंचायत माणगाव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावातील सुमारे 50 घरांचे नुकसान झाले होते. गावातील 50 टक्के घरावरील कौले व पत्रे उडून गेली होती. तसेच घरातील फर्निचर आणि अन्नधान्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तत्कालीन तलाठी माणगाव तर्फे वरेडी यांच्यामार्फत नुकसानीबाबत पंचनामे करून तात्काळ पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय यांच्याकडे पाठविण्यात आले. मात्र, शासनाने त्यापैकी एकाही शेतकर्‍यास नुकसानभरपाई देण्याची काळजी घेतली नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावू बसले आहेत.

दहा महिन्यांचा कालावधी उलटूनही नुकसान भरपाईची रक्कम नुकसानग्रस्तांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त आंबिवली गावातील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करून या प्रकरणाकडे आपण जातीने लक्ष देऊन नुकसानग्रस्तांसाठी योग्य तो निधी उपलब्ध करून द्यावा तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई आदा करण्याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांना आदेशित करावे, अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली होती. परंतु, अद्याप कोणतेही नुकसानभरपाई मिळाली नसल्यामुळे आंबिवली गावातील नुकसानग्रस्त नागरिकांनी तहसील कार्यालय कर्जत गाठले व झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी तहसीलदार धनंजय जाधव यांच्याकडे निवेदन पत्र देऊन करण्यात आली. यावेळी आंबिवली गावातील नुकसानग्रस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version