नेत्यांचे खुर्चीमिलन, कार्यकर्त्यांचे काय?
| रायगड | आविष्कार देसाई |
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हा कार्यालय अलिबाग शहरातील ब्राम्हण आळीमध्ये आहे. लोकसभा निवडणूकीत या कार्यालयाची पायरी चढताना भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकत्यांचे पाय जड होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकमेकांची तोंड न बघणार्या महायुतीमधील कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी अलिबाग बायपासमार्गावरील चर्चसमोर संपर्क कार्यालय सुरु करावे लागले आहे. नेत्यांचे मनोनिलन झाले असले, तरी कार्यकर्त्यांचे झालेले नाही याची प्रचिती या कृतीतून दिसून येते.
रायगड लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीचे शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार म्हणून अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज (दि.15) एप्रिल रोजी भरला आहे. त्यांच्या विरोधात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवार सुनील तटकरे आहेत. या दोघांमध्येच खरी लढत होणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याने राजकीय धुरळा उडू लागला आहे. विविध सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
या आधी भाजपा आणि शिंदे गटाच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या भिडले आहेत. प्रत्येक पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवरील टीका केली आहे. आता याच सर्वांना एकमेकांच्या गळ्यात गळा घालून तटकरेंचा प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजपा, शिंदे गटातील कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच अडचण होत आहे. निवडणूकीच्या कामानिमित्त त्यांना सातत्याने राष्ट्रवादी भवनमध्ये जावे लागत आहे. परंतु या आधी आपले कट्टर विरोधक असणार्या तटकरेंच्या कार्यालयात कसे जायचे, असा संकोच कदाचित कार्यकर्त्यांच्या मनात येत असावा. म्हणून या कार्यालयात कोणी फिरकत नसल्याने येथे सामसुम असल्याचे दिसत होते. महायुतीमधील कार्यकर्त्यांना एकसंघ राहावे, यासाठी आणि सर्वांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तटकरे यांना बायपास मार्गावरील चर्चसमोरील गाळ्यांमध्ये आपले संपर्क कार्यालय थाटावे लागले आहे. या ठिकाणी आता महायुतीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र बसतील, विचारविनीमय करतील, अशी आशा करायला हरकत नाही.
दरम्यान, महायुतीमधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्र बसण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण असावे, अशी सर्वांचीच इच्छा होती. त्यामुळे बायपास येथे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने सांगितले.