पुणे शहर म्हणजे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी इत्यादी प्रतिमा पूर्वापार रुजलेल्या आहेत. पण पुण्याच्या दुसऱ्या बाजूची फार चर्चा होत नाही इतकाच त्याचा अर्थ. याच तथाकथित सोज्वळ शहरात विरोधकावर भाडोत्री मारेकरी घातले जात होते हे महात्मा फुल्यांच्या जीवनचरित्रातून कळते. टिळक-आगरकरांच्या वादात एकमेकांच्या प्रेतयात्रा काढल्या जाणे, सभा उधळणे, मेळ्यांमध्ये अचकट विचकट गाणी सादर करणे हे कित्येक काळ घडत होते. अलिकडच्या काळात पूर्व पुण्यातील माळवदकर व आंदेकर यांच्या टोळ्यांमध्ये सतत टोळीयुध्द चालत असे. आता त्यात इतर टोळीवाल्यांची आणि त्यांच्या राड्यांची भर पडली आहे. काही महिन्यांपूर्वी एका विद्यार्थिनीवर सदाशिव पेठेत भर दिवसा कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. गेल्या आठवड्यात कोथरुडमध्ये भर दिवसा शरद मोहोळ या कुविख्यात गुन्हेगाराची गोळ्या घालून हत्या झाली. शहरे वाढतात तसतशी तेथील जमिनींच्या आणि घरांच्या किमती प्रचंड वाढतात. इतर कोणत्याही धंद्यापेक्षा यामध्ये हुकुमी आणि सर्वाधिक नफा मिळतो. त्यात गुंडांच्या टोळ्या शिरतात. दिल्ली, मुंबईपासून सर्व बड्या शहरांमध्ये हे घडले आणि आता ते पुण्यातही होत आहे. एरवी याकडे एक नेहमीची गुन्हेगारी घटना म्हणून पाहता आले असते. पण याला असलेली राजकीय किनार ही भीषण वस्तुस्थिती आहे. मोहोळवर अनेक गुन्हे नोंदलेले होते व तो दहा वर्षे तुरुंगात राहून आलेला होता. तुरुंगात असताना याच मोहोळने जर्मन बेकरी प्रकरणातील संशयित मुस्लिम आरोपीची गळा आवळून हत्या केली होती. याच कारणासाठी त्याला गुन्हेगार नव्हे तर धर्मरक्षक आणि हिंदुत्ववादी मावळा म्हणावे असा प्रचार पुण्यातील भाजपवाले सध्या करीत आहेत. शरद मोहोळ हा हिंदू मुलींच्या रक्षणासाठी कसा धावून जात असे आणि गोहत्याविरोधासाठी त्याने कसे काम केले असे सांगणारे व्हिडिओ सध्या व्हायरल केले जात आहेत.
रामाचे नाव घेणारे
शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ हिने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात वाजतगाजत भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला होता. मंत्री आणि कोथरूडचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील तेव्हा हजर होते. स्वाती यांना शहर भाजपचे सरचिटणीस करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वी शरद मोहोळ यांनाही भाजपमध्ये पद दिले जाईल असे म्हटले जात होते. सध्या अयोध्येत राममंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू आहे. राम हा न्यायी, प्रजाहितदक्ष व आपल्या प्रतिमेला जपणारा राजा होता. म्हणून रामराज्य ही आदर्श कल्पना आहे. भाजपवाले या रामाच्या नावाने मते मागत आहेत. पण त्यांना येथे रामराज्य नव्हे तर आपल्या कल्पनेतील हिंदुराज्य आणायचे आहे. या हिंदुराज्यात खून, खंडणी इत्यादी आरोप असलेले लोकही भाजपमध्ये आले की त्याचे सन्माननीय कार्यकर्ते होतील अशी सोय आहे. त्या आरोपीने मुस्लिमविरोधी काही कृत्य केले वा भाष्य केले तर मग तो भाजपवाल्यांच्या लेखी हिरोच ठरतो. मोहोळ यालाही असेच हिरो करण्यात आले. एकेकाळी याच भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांचे पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर इत्यादींशी संबंध असल्यावरून मोठे रान उठवले होते. नंतर त्यांची सत्ता येऊनही प्रत्यक्षात त्यांना त्यातील एकही आरोप सिध्द करता आला नाही. उलट नंतर त्याच हितेंद्र ठाकूर यांच्याशी भाजपचे मधुर संबंध जुळले. पुण्यातही माळवदकर, आंदेकर किंवा अलिकडे मारणे अशा गुन्हेगारी टोळ्यांमधील व्यक्तींचे सर्व पक्षातील लोकांशी संबंध असल्याचे बोलले गेले. या टोळीवाल्यांच्या नातेवाइकांना प्रवेश वा पदे दिली गेली. त्यावरून राष्ट्रवादी, शिवसेना किंवा मनसे यांच्यावर टीका झाली. पण ही टीका या पक्षांनी निमूटपणे ऐकून घेतली होती. हे संशयित गुन्हेगार हे देश किंवा तत्वासाठी लढणारे योध्दे आहेत असा बचाव किंवा उलटा कांगावा त्यांनी कधी केला नव्हता. आता मात्र मोहोळ यांच्यासारख्यांना मुस्लिमाचा खून केला म्हणून अभिमानाने आपला कार्यकर्ता असे मिरवले जात आहे.
सत्तेचा माज
एकेकाळी काही फौजदारी वकील सर्वत्र फार प्रसिध्द असत. एखादा दिवसाढवळ्या, सर्वांसमक्ष खून जरी करून आला तरी त्याला हे वकील निरपराध शाबीत करू शकतात असा त्यांचा लौकिक असे. भाजपने आज हाच लौकिक कमावला आहे. इतकेच नव्हे तर त्याला तात्विक मुलामा चढवण्याचे कामही तो करीत आहे. सत्ता डोक्यात गेली असल्याचे हे लक्षण आहे. आपण काहीही केले, कशाही उलटसुलट गोष्टी घडवल्या तरी आपल्याला कोणीही धक्का लावू शकत नाही अशी भाजपची भावना झाली आहे. अगदी खून व बलात्कारासारखी कृत्येही हिंदुत्व, देव, देश अशांच्या नावाखाली पावन करून घेता येऊ शकतात असे त्याला वाटते व निवडणुकीत सतत जिंकत असल्याने हा समज बळकट होत चालला आहे. हा मजकूर लिहित असतानाच बिल्किस बानू प्रकरणातील आरोपींबाबतचा एक निकाल आला आहे. गुजरात दंगलीदरम्यान बिल्किसवर बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याचा आरोप सिध्द होऊन आरोपींना जन्मठेप झाली होती. हे सर्व आरोपी भाजपशी संबंधित होते. गेल्या गुजरात निवडणुकांपूर्वी गुजरात सरकारने त्यांची सुटका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय सोमवारी रद्दबातल ठरवला. पण मुळात गुजरात सरकारने आपली कार्यकक्षा ओलांडून बेधडक त्यांची सुटका केली होती. नंतर त्या आरोपींचे भाजपकडून गावागावांमध्ये असे काही स्वागत झाले होते की जणू काही रणभूमीवरून पराक्रम गाजवून सैनिकच घरी परतले आहेत. हा सर्व सत्तेतून आलेला माज आहे. आतादेखील हे आरोपी पुन्हा सुटणारच नाहीत याची खात्री नाही. मुद्दा असा की, भाजपने आजच्या काळात गुन्हेगार कोण याची व्याख्याच बदलून टाकली आहे. एकीकडे निव्वळ सरकारविरोधात घोषणा किंवा भाषणे दिली म्हणून कार्यकर्त्यांविरोधात देशद्रोहाची कलमे लावली जात आहेत. तर दुसरीकडे खंडणी, खून असे आरोप असलेले गुंड हिंदुत्वाची भाषा बोलू लागले की त्यांना कार्यकर्ते म्हटले जाऊ लागले आहे.