| रायगड | खास प्रतिनिधी |
शनिवारी सात उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाल्यानंतर आता सोमवारी कोणते उमेदवार लोकसभेच्या आखाड्यातून माघार घेणार हे स्पष्ट होणार आहे. सध्या इंडिया आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यासह अन्य 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खासदार होण्यासाठी सुरुवातीला 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती. उमेदवार अधिक असल्याने निवडणूक विभागाचीदेखील अडचण होणार आहे. छाननीमध्ये सात उमेदवार बाहेर पडले आहेत, तर अद्याप 21 उमेदवार रिंगणात आहेत. इंडिया आघाडीचे शिवसेनेचे अनंत गीते आणि महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, वंचितच्या कुमोदीनी चव्हाण यांच्यासह काही अपक्ष उमेदवार हे निवडणूक रिंगणात कायम राहणार असले, तरी खरी लढत शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी अशीच होणार असल्याने तेच खर्या अर्थाने प्रचाराचे रान पेटवणार आहेत.
7 मे रोजी मतदान होणार आहे. तर, मतदानाच्या दोन दिवस आधीच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांचा फैरी दोन्हीकडून झडत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी चांगलेच कामाला लागल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. त्यांची मनधरणी करताना सर्वांचीच चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
दरम्यान, 15 पेक्षा अधिक उमेदवार कायम राहिल्यास निवडणूक विभागाला दोन बॅलेट युनिट जोडावे लागणार आहेत. त्यामुळे निवडणूक विभागही उमेदवारांच्या माघारीकडे लक्ष ठेवून आहे. उमेदवारांना सोमवारी (दि. 22) दुपारी तीन वाजेपर्यंत आपला अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.