धनगर बांधवांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात
| महाड | प्रतिनिधी |
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या दक्षिण भागात काही दिवसांपूर्वी भीषण वणवा लागल्याची घटना समोर आली आहे. डोंगर उतारावर धगधगणाऱ्या आगीचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली हद्दीतील दरीत लागलेला वणवा पुढे रायगडाच्या दक्षिणेकडील डोंगर उतारावर पसरला. ही आग पुढे भवानी टोक आणि काळा हौद परिसरापर्यंत पोहोचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या अंधारात डोंगर उतारावर धगधगणारी आग दूरवरूनही दिसत होती. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इतिहासातील पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर तोफांचा मारा झाल्याच्या घटनेची आठवण अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केली. त्यामुळे या वणव्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली.
दरम्यान, किल्ल्यावर वास्तव्यास असलेले धनगर बांधव आणि पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने वणवा विझवण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या आगीत किल्ल्यावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूंना कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती मिळाली असून, मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेमुळे रायगड परिसरातील वनसंवर्धन आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.







