उरणकरांसह, पक्षीप्रेमींचा आरोप
| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील वनसंपदेच्या रक्षणाकडे वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाने दुर्लक्ष केल्याने आज तालुक्यातील माती, दगडमाफियांनी जोरदार डोंगर, माळरान परिसर पोखरण्यास सुरूवात केली आहे, असा आरोप उरणकरांकडून करण्यात येत आहे. माती काढणे सोयीस्कर व्हावे यासाठी वृक्षवल्लीने भरलेल्या जंगलांना आगी लावण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी (दि.1) कडापे-वशेणी परिसरातील जंगलात वणवा लावण्यात आला होता. मात्र, प्राणीमित्र आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर मेहनत करून हा वणवा विझवला.
उरण तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे.अशा वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील दगड खाण व्यावसायिकांचा आणि माती उत्खनन करणाऱ्या व्यवसायिकांचा धंदा तेजीत आला आहे. अशा दगड खाण व्यवसायामुळे आणि माती उत्खननामुळे या तालुक्यात पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात काही दगड माती उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांनी वन आणि महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून डोंगर, माळरान परिसराला आगी लागण्यास सुरुवात केल्याने येथील जंगलातील प्राण्यांच्या, पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे पक्षीमित्रांचे म्हणणे आहे.
उरण तालुक्यातील विंधणे, चिरनेर, रानसई, मोठी जुई, कोप्रोली, पुनाडे, वेश्वी, वशेणी, चिर्ले, जासई ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, डोंगर परिसरात वावरणाऱ्या प्राण्याच्या, पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या आगीचा (वणव्याचा) धसका घेतलेले प्राणी आपले जीव वाचवण्यासाठी आणि अन्नपाणी शोधण्यासाठी सैरभैर झाले आहेत. तर माकडेही गावात घरादारावर उड्या मारताना पाहावयास मिळत आहेत.
कडापे-वशेणी येथील डोंगरात अज्ञात समाजकंटकांनी वणवा लावला होता. या वणव्याची माहिती मिळताच वणवा विझवण्याचे काम फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)चिरनेर उरणच्या राकेश शिंदे व हृषिकेश म्हात्रे यांनी केलं. यावेळी त्यांच्यासोबत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीदेखील होते. वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलांचा नाश होत असून, अनेक पक्षी, त्यांची घरटी, अंडी, लहान जीव, कीटक, सरपटणारे प्राणी नष्ट होऊन पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याने ग्रामस्थांनी जंगलात वणवा लागू नये म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरणतर्फे ग्रामस्थांना करण्यात आले आहे.