| पंढरपूर | प्रतिनिधी |
पंढरपूर येथील सामाजिक वनीकरण विभागात झालेले कथित वृक्ष लागवड घोटाळा प्रकरण थेट विधानसभेत पोचले आहे. सांगोल्याचे आमदार डाॅ. बाबासाहेब देशमुख यांनी या प्रकरणी चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत केली आहे. आमदार देशमुख यांच्या या मागणीनंतर आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
शतकोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने वृक्ष लागवड करण्यात आल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार 4 ऑगस्ट 2022 रोजी सामाजिक वनीकरण विभागातील आठ जणांविरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 109 कोटी रुपयांचा वृक्ष लागवड घोटाळा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चव्हाण यांनी सर्व पुरावे न्यायालयात दाखल करुन दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे दाखल होवून दोन – अडीच वर्षे झाली परंतु, अद्याप दोषींवर कोणतीच कारवाई झाली नाही. दरम्यान विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये सांगोल्याचे आमदार डाॅ. बाबासाहेब देशमुख यांनी पंढरपूर, मंगवेढा व सांगोला तालुक्यातील वृक्ष लागवड योजनेत झालेल्या गैर प्रकाराची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात आमदार देशमुख यांनी लक्षवेधी द्वारे सभागृहाचे व वन मंत्र्यांच्या या घोटाळ्याकडे लक्ष वेधले आहे. आमदार बाबासाहेब देशमुख यांनी या घोटाळ्याला विधानसभेत वाचा फोडली आहे. यावर वनविभाग आता कोणती कारवाई करणार याकडेच लक्ष लागले आहे.