। पिंपरी चिंचवड । वृत्तसंस्था ।
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यादृष्टीने वातावरनिर्मितीही झाली होती. परंतु, ज्या शरद पवारांच्या वक्तव्यामुळे ही सगळी चर्चा सुरु झाली त्यांनीच आता या सगळ्या तर्कवितर्कांना ब्रेक लागला आहे. जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले, अशा संधीसाधू लोकांना आपल्याला सोबत घ्यायचे नाही. गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे असलेल्यांना सोबत घेऊ, असे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. पिंपरी चिंचवड येथे मंगळवारी (दि.17) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, सगळ्यांना बरोबर घेतले पाहिजे, असे वारंवार म्हटले जात आहे. परंतु, सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असतील तरच त्यांना सोबत घेऊ. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध ठेऊ नका. मात्र, जे सत्तेसाठी भाजपसोबत गेलेत त्यांना आपण सोबत घेऊ शकत नाही. हा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही. त्यामुळे अशा संधीसाधूपणाचे राजकारण करणाऱ्यांना आपण सोबत घेऊ शकत नाही. त्या दिशेने आपल्याला पावले टाकायची नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता मावळल्याचे संकेत मिळत आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे. विकास असा करायचा आहे, ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, परंतु ज्या-ज्यावेळी असे घडले, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढेही टिकून राहणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी, ‘प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे’, अशी मोघम प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या प्रक्रियेचे पुढे काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.







