। अलिबाग । भारत रांजणकर ।
राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. अलिबाग तालुक्यातही थंडीची तीव्रता वाढली असून, मंगळवारी (दि.11) यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. शहरात किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस इतके नोंदले असून, अलिबाग येथील कुलाबा चुंबकीय वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्याचे तापमान 7 जानेवारीपासून तब्बल 5 अंश सेल्सिअसने घसरले आहे.
![](http://krushival.in/grygrars/2022/01/WhatsApp-Image-2022-01-11-at-21.17.18.jpeg)
गेल्या 4-5 दिवसांपासून अलिबागकर सुखद गारवा अनुभवत आहेत. अलिबागचा पारा 7 जानेवारीपासून 8 अंश सेल्सिअसने घसरला असून मंगळवारी 15.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे अलिबागमध्ये थंडीचा जोर वाढला असून अलिबागकर चांगलेच गारठले आहेत.यंदा सर्वांनाच लहरी हवामानाचा फटका बसला. कधी कडाक्याचे ऊन तर कधी पाऊस. या वातावरणातील बदलामुळे गेल्या आठवड्यातही ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा सामना रायगडकरांना करावा लागला. मात्र आता थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. दिवसा ऊन पडत असले तरी वातावरणात गारवा जाणवत असल्याने घर, कार्यालयातील पंखे, एसीला सक्तीची रजा मिळाली आहे. ठेवणीतले स्वेटर, हातमोजे, कानपट्ट्या, शाल बाहेर पडल्या आहेत. पहाटे आणि सायंकाळच्या वेळी गारवा जास्त जाणवतो. अशा वेळी वार्याची झुळूक आली तरी कुडकुडायला होते.अलिबागकर सध्या या थंडीचा आनंद लुटत आहेत. सकाळच्या वेळी चालायला जाणारे नागरिक टपरीवर वाफाळणारा चहा घेतानाचे दृश्य दिसू लागले आहे. शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. एकंदरीत या थंडीमुळे आल्हाददायी वातावरण निर्माण झाले आहे.