महिलेच्या हाती व्यवसायाची दोरी

आगरी लस्सीचा ब्रँड केला विकसित

| बेणसे | वार्ताहर |

रायगड जिल्हा येथील आगरी कोळी समाजाच्या वेगवेगळ्या लज्जतदार खाद्य पदार्थांसाठीही ओळखला जातो. मात्र, येथे आगरी लस्सी हा नवा ब्रँड तयार झाला आहे. विशेष म्हणजे एक महिला हा ब्रँड चालवत आहेत. हंगामात निव्वळ लस्सीतून दिवसाला पाच हजार उत्पन्न मिळते. असंख्य लोक येथे येऊन आगरी लस्सीचा आस्वाद घेऊन तृप्त होतात. याशिवाय आगरी मसाला ताक, गाईचे व म्हशीचे आगरी सात्विक तूप आणि आगरी खरवस हे देखील प्रसिद्ध आहे.

मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील आमटेम हे गाव आहे आणि या गावातच आगरी लस्सी ब्रँडचा जन्म झाला. आगरी लस्सीचे छोटे दुकान येथे आहे व बाजूला म्हात्रे डेअरी आहे. महामार्गावरून येणारे अनेक जण येथे आगरी लस्सीचा फलक पाहून आवर्जून थांबतात. या ब्रँडच्या निर्मात्या अनिता म्हात्रे या येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला स्मित हास्य आणि नम्रपणे आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेली लस्सी मातीच्या कुल्हड मध्ये देतात. सोबतीला त्यांचा मुलगा देखील असतो. अनिता म्हात्रे यांनी आगरी लस्सीचा प्रवास कसा सुरू झाला ते सांगितले, अनिता यांचे पती शेती करतात तर मोठा मुलगा मितेश याचे ज्वेलरीचे दुकान आहे. तर एक मुलगा कल्पेश हा म्हात्रे डेअरी चालवतो. दोन मुलींची लग्न झाली आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी म्हात्रे डेअरी नावाने डेअरीचा व्यवसाय सुरू केला. त्याच वेळी येथे काही स्पेशल करण्याचा विचार केला व लस्सी बनवण्याचे ठरले. नुसते लस्सी विकण्यापेक्षा तिला स्थानिक टच आणि नाव देण्यात यावे असा विचार केला. मग अनिता यांचा मुलगा मितेश याने आगरी लस्सी हे नाव दिले. लस्सीची चव, ग्राहकांचे आदरातिथ्य व स्वच्छता यामुळे आगरी लस्सी ब्रँड प्रसिद्ध झाला. नाव वाचूनच लोक लस्सी टेस्ट करण्यासाठी येतात व तृप्त होतात.

घरगाडा चालतो
गर्मी हंगाम व गणपती सण व ऑक्टोंबर हिटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होते. दिवसाला पाच हजार पर्यंत कमाई होते. साधारण 15 ते 20 किलो लस्सी संपते. तर इतर दिवशी हजार ते बाराशे रुपये उत्पन्न मिळते. यातून अनिता याचे घर चालते.
काय आहे लस्सीत?
या लस्सीचे वेगळेपण काय असे विचारल्यावर अनिता म्हात्रे सांगतात की या लस्सीत आम्ही बाहेरचे कोणतेच पदार्थ मिळवत नाही. फक्त साखर व वेलची घेतली जाते. मागणी नुसार ड्रायफ्रुड टाकले जातात. लस्सी साठी लागणारी दही तसेच मलाई अनिता स्वतः बनवतात आणि लस्सी देखील स्वतःच्या हाताने तयार करतात. दही बनविण्यासाठी गावठी म्हशीचे दूधच वापरले जाते. ही लस्सी घट्ट आणि चविष्ट असते. दही संपल्यावर बाहेरून दही आणले जात नाही. मग दुकान बंद केले जाते. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी बनवलेल्या दहीद्वारे लस्सी बनवली जाते. उन्हाळ्यात साधारण 20 ते 25 किलो तर इतर हंगामात 15 किलो लस्सी संपते. आगरी मसाला ताक, गाईचे व म्हशीचे आगरी सात्विक तूप आणि आगरी खरवस हे जिन्नस सुद्धा अनिता स्वतः बनवितात. या उत्पादनांना देखील खूप मागणी आहे.
आवर्जून थांबतात
अनिता यांनी सांगितले की आगरी लस्सी पिण्यासाठी रत्नागिरीचे एक आमदार आवर्जून थांबतात. शिवाय मनोरंजन क्षेत्रातील कलाकार व माध्यमातील लोक देखील आवर्जून भेट देऊन लस्सीचा आस्वाद घेतात.
Exit mobile version