माजी आमदार धैर्यशिल पाटील
। पेण । वार्ताहर ।
विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्त्याच्या भू-संपादनाच्या शेतकर्यांना विश्वासात न घेता मोजणीला सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या मनात संभ्रम स्थिती निर्माण झाली आहे. तसेच प्रशासनाकडून शेतकर्यांना योग्य प्रकारे माहिती पुरविली जात नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी प्रकल्पबाधित शेतकरी समितीने माजी आ. धैर्यशिल पाटील यांच्याशी संपर्क करून आपली व्यथा सांगितली आणि आ. धैर्यशिल पाटल यांनी देखील तातडीने सदर बाबींचा पाठपुरावा करत प्रकल्पग्रस्तांना वार्यावर सोडणार नाही असे सांगितले.
विरार-अलिबाग बहुउद्देशीय 99 मी. रूंद मार्गिका विकसीत करण्यासाठी रावे, कोपर, गोविर्ले, जिते, चुनाभट्टी, बलवळी, आंबिवली या सात गावातील शेतकर्यांना महसुल खात्याकडून नोटीस देण्यात आल्या असून या नोटीसीनुसार शेतकर्यांनी जागा संपादनाच्या मोजणीला मदत करायची आहे. पंरतु ही सर्व प्रक्रिया करत असताना शेतकर्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग संतापले आहेत. अखेर शेतकर्यांनी माजी आ. धैर्यशिल पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी आ. धैर्यशिल पाटील यांनी शेतकर्यांची सर्व व्यथा ऐकून उपविभागीय अधिकार्यांशी संपर्क केला आणि तातडीने भू-संपादनासाठी चालेली मोजणी थांबवण्यास सांगितले. जो पर्यत विरार-अलिबाग बहुउद्देशीय प्रकल्पासाठी भू-संपादनबाबत जो पर्यंत काही ठोस निर्णय होत नाहीत व त्याची पूर्ण कल्पना जोपर्यंत शेतकर्यांना देण्यात येत नाही. तोपर्यंत भू-संपादन मोजणी करून देणार नाही. यावेळी उपविभागीय अधिकार्यांनी येत्या दोन दिवसात प्रकल्पबाधित शेतकरी संघर्ष समिती बरोबर बैठक लावणार असून जो पर्यंत या बैठकीत योग्य निर्णय होत नाही तो पर्यंत मोजणी होणार नाही असे ही सांगण्यात आले.
आपल्या ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवल्या शिवाय या प्रकल्पाला जागा संपादन करू देणार नाही. आपला प्रकल्पाला विरोध नसला तरी आपल्याला योग्य मोबदला, पुर्नवसन या गोष्टींचा विचार करून ते भविष्याच्या दृष्टीने कशा प्रकारे दिल्या जातील. याचा विचार करणे गरजेच आहे व यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे.
माजी आ. धैर्यशिल पाटील.