पंढरपुरात संचारबंदी जारी
बाहेरून येणार्या कोणलाही प्रवेश नाही
पंढरपूर | प्रतिनिधी |
ना टाळ, ना चिपळ्या, ना मृदुंगाचा निनाद, ना वारकर्यांंची लगबग,दरवर्षी आषाढी एकादशीच्या अनुपम सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून येणार्या लाखो वारकर्यांच्या उपस्थितीने गजबजून जाणारी विठुरायाची पंढरी गेल्या दोन वर्षांपासून सुनीसुनी झाली आहे.कोरोनाची साथ अद्यापही आटोक्यात न आल्याने आषाढी एकादशीचा सोहळा यावर्षीही मर्यादित स्वरुपात साजरा केला जाणार आहे.त्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पंढरपुरात रविवारपासून संचारबंदी जारी करण्यात आली आहे. पुढील चार दिवस तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
आषाढी एकादशी 20 जुलै रोजी आहे प्रतीकात्मक पद्धतीने हा सोहळा साजरा होणार आहे दहा मानाच्या पालख्यामधील वारकर्यांना व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला पंढरपूर शहरामध्ये प्रवेश असणार नाही.रविवारी सकाळी संचारबंदी सुरू झाल्यापासून पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे येणारे सर्व मार्ग बॅरिकॅडींग टाकून बंद करण्यात आलेले आहेत या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा असून प्रदक्षिणा मार्गावर ही पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.चंद्रभागा नदी कडे जाणारे रस्ते बॅरिकेट्स टाकून बंद करण्यात आलेले आहेत.
अत्यावश्यक सेवा वगळता पंढरपूर मध्ये इतर सर्व स्थापना संचारबंदी च्या काळामध्ये बंद असणार आहेत. 24 जुलै च्या दुपारपर्यंत संचार बंदी असणार आहे. 24 जुलैला पौर्णिमेचा काला झाल्यानंतर सर्व पालख्या पंढरपुराततून बाहेर पडल्यानंतर संचारबंदी शिथिल होणार आहे.