रुग्णालयाबाहेर पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश
| अमरावती | प्रतिनिधी |
ज्यांनी अजून आईच्या कुशीतून बाहेर पडून जगही पाहिले नव्हते, ज्यांच्या छोट्याशा रडण्याने घरात आनंदाची पहाट झाली होती, त्या चार ते दहा दिवसांच्या तीन चिमुकल्या जीवांची पहाटच काळोखात हरवली. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. धुराच्या विळख्यात सापडलेल्या तीन नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू झाला. रुग्णालय परिसरात मृत बालकांच्या मातांनी ‘आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही… आमची लेकरं गेली’ असा टाहो फोडल्याने उपस्थितांचे काळीज अक्षरशः हेलावून गेले. या दुर्घटनेने केवळ अमरावती नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे.
मृत बालकांना शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होताच नातेवाईकांनी तीव्र विरोध केला. ‘आमचे बाळ आम्हाला परत द्या… बाळाला कुठेही नेऊ नका… पोस्टमार्टेमसाठी घेऊन जाऊ नका,’ अशी आर्त विनवणी करीत आई-वडिलांनी हंबरडा फोडला. काही वेळापूर्वी ज्या चिमुकल्याच्या आयुष्याची स्वप्ने रंगवली होती, त्याच बाळाचा निर्जीव देह डोळ्यांसमोर पाहण्याची वेळ पालकांवर आली. हा आक्रोश पाहून रुग्णालय परिसरातील प्रत्येकाचे डोळे पाणावले.
आग लागली तेव्हा एसएनसीयू विभागात नऊ नवजात बालके उपचार घेत होती. अचानक धूर पसरल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांनी प्रसंगावधान राखत बालकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सहा बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले; मात्र तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतर दोन एसएनसीयू कक्षांमधील सुमारे 30 बालकांनाही खबरदारी म्हणून अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. दोन गंभीर बालकांवर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान आगीच्या या दुर्दैवी घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तेथे जाऊन पाहणी केली. आगीच्या या दुर्घटनेसंदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली. ‘ नवजात शिशूच्या मृत्यूच्या सखोल चौकशी साठी समिती गठीत करणार’ अशी घोषणा आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना केली. आठ दिवसात त्या समितीचा अहवाल समोर येईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
या दुर्घटनेतील मृत बालकांमध्ये बोराळा, ता. चिखलदरा येथील मातेची नवजात मुलगी, पुलगाव, जि. वर्धा येथील तसेच खेड, ता. अंजनगाव सुर्जी येथील मातांच्या दोन नवजात मुलांचा समावेश आहे. अवघ्या चार ते दहा दिवसांच्या या चिमुकल्यांना रुग्णालयाच्या चार भिंतींपलीकडचे जगही पाहता आले नाही. ज्या हातांनी बाळाला अलगद कुशीत घ्यायचे होते, त्याच हातांनी आता त्याचा निर्जीव देह पाहण्याची वेळ मातांवर आली. त्यांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर सुन्न झाला.
तीन नवजात बालकांच्या मृत्यूची बातमी पसरताच रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली. मृत बालकांच्या नातेवाईकांचा आक्रोश आणि संताप पाहता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
सुरक्षा यंत्रणा कुठे होती?
नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर अलार्म आणि स्प्रिंकलर यंत्रणा कार्यान्वित झाली नाही, असा आरोप होत असल्याने रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचे परीक्षण, उपकरणांची देखभाल आणि आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत आता कठोर चौकशीची गरज निर्माण झाली आहे.






