कोकणातील करवंदे येणार आता मराठवाड्यात

सुधागडमधून पोस्टाने बिया रवाना
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
बीड जिल्ह्यातील अभिमान खरसाडे हे पर्यावरणवादी कार्यकर्ते भिषण दुष्काळ व जंगलांची कमतरता असलेल्या मराठवाडा विभागात पर्यावरण संवर्धनाचे काम करतात. तिथे त्यांचा रायगडातील करवंदाची झाडे वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि तसे आवाहन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. त्यानुसार त्यांना लागणार्‍या करवंदाच्या बिया सुधागड तालुक्यातून नुकत्याच मोफत पाठविण्यात आल्या आहेत. या बियांची लागवड तिथे करण्यात येत आहे.

याबाबत ज्यांना शक्य असेल त्यांनी बिया गोळा करून खरसाडे यांच्यापर्यंत पोहच करू आणि ते करीत असलेल्या कामाला थोडा हातभार लावू यात असे आवाहन सिद्धेश्‍वरचे सरपंच उमेश यादव यांनी केले होते. त्यानुसार सिद्धेश्‍वर आदिवासी वाडी येथील आदिवासी समाजाचे पदाधिकारी कृष्णा वाघमारे यांनी विविध ठिकाणावरून काही बिया गोळा करून दिल्या. तसेच सीमा उमेश यादव यांनी काही बिया गोळा केल्या आणि या जमलेल्या बिया पोस्टाने पाठवून दिल्या आहेत. मराठवाड्या सारख्या भीषण दुष्काळी भागात अभिमान खरसाडे हे झाडे जगविण्यासाठी नवीन प्रयोग करीत आहेत. त्यांची यासाठी असलेली धडपड जाणवली आणि त्यांच्या या पर्यावरण संवर्धन कार्याला थोडासा हातभार लावावा या हेतूनं हे काम केले आहे. असे सरपंच उमेश यादव यांनी सांगितले. या बहुमूल्य सहकार्याबद्दल खरसाडे यांनी रायगड वासीयांचे आभार मानले.

शासकीय गायरान जमिनीवर या बिया लावण्यात येतील. तर यापैकी 50 रोपे तयार करून पुढच्या वर्षात लागवड करण्यासाठी संवर्धित करण्यात येणार आहेत.
अभिमान खरसाडे, संकल्पक

Exit mobile version