आरोपीकडून दुसऱ्यांदा बालकाचे अपहरण; पोलिसांची शोधमोहीम सुरू
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाळ गावातून हायस्कूलला जाणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. क्षेत्रपाळ येथीलच एका व्यक्तीने या अल्पवयीन विद्यार्थ्याला फूस लावून नेल्याची तक्रार त्याच्या पालकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीने यापूर्वीही एका अल्पवयीन बालकाचे अपहरण केले होते. त्या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू असतानाच त्याने पुन्हा एकदा बालकाचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्षेत्रपाळ गावातील नरेंद्र पांडुरंग शिंदे हे सध्या कुटुंबासह नालासोपारा येथे वास्तव्यास असून तेथे दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. त्यांचे दोन्ही मुलगे गौरव (13) व राघव (3) हे आजी-आजोबांसोबत क्षेत्रपाळ येथे राहात होते. 4 मार्च रोजी सकाळी गौरव शाळेसाठी घरातून निघाला होता. त्यानंतर क्षेत्रपाळ गावातील सुरेश केरू जाधव याच्यासोबत तो पोलादपूर येथे दिसल्याची माहिती गावातील गणेश कदम यांनी मोबाईलवरून त्याच्या वडिलांना दिली.
याबाबत नरेंद्र शिंदे यांनी सुरेश जाधव याच्याशी संपर्क साधला असता गौरव त्याच्यासोबत असल्याचे त्याने कबूल केले आणि दोन तासांत घरी सोडतो, असेही सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा मोबाईल बंद येऊ लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. गौरव घरी न परतल्याने शिंदे कुटुंबियांनी अखेर पोलादपूर पोलिसांकडे धाव घेत अपहरणाची तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने मुलगा आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील कदम आणि पोलीस कर्मचारी सुनील कांजर तपास करत आहेत. दरम्यान, अपहृत मुलगा गौरव आणि आरोपी सुरेश जाधव यांची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली असून, कोणाला ते आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
सुरेश केरू जाधव हा क्षेत्रपाळ गावातील रहिवासी असून, ट्रक चालक म्हणून काम करतो. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याने क्षेत्रपाळ येथील सचिन खुटेकर या 10 वर्षीय बालकाचे अपहरण केले होते. त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अपहरण केलेल्या बालकाला त्याने पाच दिवसांनंतर परत आणून सोडले होते. त्या गुन्ह्याचा खटला अद्याप न्यायालयात सुरू असतानाच जाधव याने पुन्हा एकदा 13 वर्षीय गौरव शिंदे याचे अपहरण केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.







