साडेआठ महिन्यांत चारशे रुग्ण आढळले
पनवेलमधील शहरी भागासह अलिबाग तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यामध्ये साडे आठ महिन्यांत 400हून अधिक डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. ग्रामीण भागापेक्षा पनवेलमधील शहरी भागात आणि अलिबाग तालुक्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातला आहे. डेंग्यूला रोखण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागले आहे. डेंग्यू संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील तापाचे रुग्ण वाढण्याचा धोका आहे. ऐन गणेशोत्सवात डेंग्यू वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
रायगड जिल्हा पर्यटनासह औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपाला आला आहे. जिल्ह्यात वेगवेगळे प्रकल्प उभे राहण्याबरोबरच नवीन जागा घेऊन फार्महाऊस इतर बंगले बांधण्याचा क्रेझ वाढला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँक्रिटीकरण झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या काँक्रिटीकरणामुळे पाण्याचा निचरा होण्याचा मार्गच बंद झाला आहे. अनेक घराच्या बाजूला अथवा मागील बाजूला सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते. जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन, कधी पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून राहात आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावदेखील वाढू लागला आहे.
जिल्ह्यातील पनवेल, अलिबागबरोबरच आता पेण, रोहा, महाड अशा अनेक तालुक्यांत डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. तापाची साथ ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी होत आहे. ताप येत असल्याने अनेकजण खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेत आहेत. तरीदेखील अनेकजण बरे होत नाही. त्यामुळे हिवताप विभागामार्फत रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली जात आहे. जिल्ह्यामध्ये जानेवारी ते 16 सप्टेंबर या साडेआठ महिन्यांच्या कालावधीत साडेचार हजारांहून अधिक जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये 415 जणांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत डेंग्यूचे 371 रुग्ण सापडले आहेत. 16 सप्टेंबरपर्यंत 44 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये आतापर्यंत पनवेल शहरी भागातील 288 जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 127 रुग्णांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 19 अलिबागमध्ये 19, मुरूड, महाडमध्ये प्रत्येकी दोन, माणगाव, पेण व रोहामध्ये प्रत्येकी एक असे रुग्ण सापडले आहेत. चारशेपार सापडलेल्या रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयांसह अन्य सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार करण्यात आले आहेत. काहीजण उपचार करून बरे झाले आहेत, तर काही जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाचीदेखील धावाधाव सुरु झाली आहे. ज्या ठिकाणी रुग्ण सापडत आहेत, त्याठिकाणी यंत्रणेद्वारे तपासणी करून परिसरात कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे. गावागावात जनजागृती केले जात आहे. इतक्या उपाययोजना करूनदेखील शहराबरोबरच आता डेंग्यूने ग्रामीण भागातदेखील शिरकाव केला आहे.
शहरातील नागरिकांमुळे गावात डेंग्यू
डेंग्यू संसर्गजन्य आजार आहे. रायगड जिल्हयामध्ये पनवेल शहरात डेंग्यूचे रुग्ण अधिक सापडले आहेत. सध्या गणेशोत्सवाचा हंगाम सुरु आहे. नागरिकांची गावाकडे येणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. शहरी भागातील नागरिक गावी आले आहेत.त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील तापाचे रुग्ण वाढण्याची भिती जिल्हा हिवताप विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळेन नागरिकांनी तापस आल्यास तात्काळ उपचार करावा, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
डेंग्यू रोखण्यावर दृष्टीक्षेप
घरांच्या परिसरात अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून ठेवल्यास एडीस डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत. सखल भागात साचलेले पाणी काढून तो भाग कोरडा करावा. खिडक्यांना जाळ्या बसवून घरात डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत, यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा मोलाचा सल्ला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
डेंग्यूला रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळ्या बैठका घेणे. ताप आलेल्या ठिकाणी गावांतील नागरिकांना मार्गदर्शन करणे. उपाययोजना करणे अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातात. सध्या पावसाळी हंगाम या कालावधीत सखल भागात पाणी साचल्याने डासाची पैदास होऊन डेंग्यू होण्याचा धोका आहे. ताप आल्यावर अंगावर न काढता, जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त तपासणी करावी. औषधोपचार त्यांच्या मार्गदर्शनातून करावा. तसेच आरामदेखील करावे. डासांची उत्पप्ती होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी.
– अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी, रायगड





