कोकण रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण – पंतप्रधानांकडून कौतूक

| नवी मुंबई | प्रतिनिधी |
कोकण रेल्वे मार्गावरील आव्हानात्मक परिस्थितीत सुरु केलेले विद्युतीकरणाचे काम अखेर सात वर्षांनी शंभर टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास येत्या काही दिवसात वेगवान आणि प्रदुषणमुक्त होणार आहे. सहा टप्प्यातील विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाले असून टप्प्याटप्प्याने विजेवरील गाड्या धावण्यास सुरवात होईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोकण रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. कोकण रेल्वे आता 100 टक्के विजेवर धावण्यास सज्ज झाली आहे.
रेल्वे विद्युतीकरणातून हरित वाहतुकीचा टप्पा पूर्ण करत आहे. त्यात कोकण रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे. कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग 741 किलोमीटरचा आहे. त्याच्या विद्युतीकरणाची पायाभरणी नोव्हेंबर 2015 मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाची एकूण किंमत 1 हजार 287 कोटी रुपये आहे. त्यानंतर कोरोना काळातही काम थांबणार नाही, याची काळजी घेत हा प्रकल्प सुरु होता. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस तपासणी मार्च 2020 पासून सहा टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली. रत्नागिरी आणि थिवीम दरम्यानच्या शेवटच्या विभागाची सीआरएस तपासणी 24 मार्चला झाली. त्याचा अहवाल 28 मार्चला अधिकृतरित्या रेल्वे सुरक्षा विभागाकडून प्राप्त झाला.
कोकण रेल्वेचा अवघड भूभाग आणि अनुकूल वातावरण यामुळे विद्युतीकरण प्रकल्प हे रेल्वे प्रशासनापुढे आव्हानात्मक होते. मात्र त्या परिस्थितीवर मात करत रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण केले. पावसाळ्यात तीव्र पडणार्या पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली आहे. दरम्यान, गोव्याकडील भागातील टप्प्याचे काम सर्वात प्रथम पूर्ण झाले. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी या टप्प्याचे काम करण्यात आले. सर्वात शेवटी रत्नागिरी ते थिवीम या नव्वद किलोमीटर च्या भागाचे विद्युतीकरण झाले. करबुडेसारखे मोठे टनेल या मार्गावर असल्यामुळे त्यामध्ये विद्युतीकरणाची यंत्रणा बसवण्याचे सर्वाधिक आव्हान प्रशासनापुढे होते.

कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वेतील सर्वात मोठ्या रेल्वे मार्गांपैकी एक आहे. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने विद्युतीकरण केलेल्या मार्गावर टप्प्या-टप्प्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसह ट्रेन चालवल्या जातील. कोकण रेल्वे नेहमीच सुरक्षा नियम पाळत आली असून विद्युतीकरणाच्यादृष्टीने योग्य नियोजन केले आहे. – गिरीश करंदीकर, उपमहाप्रबंधक, जनसंपर्क, कोकण रेल्वे

Exit mobile version