। कल्याण । प्रतिनिधी ।
पालघर विभागात गेल्या चार दिवसांपासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यात अनधिकृतपणे वीजवापर करणार्यांना विशेष लक्ष करण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत 1021 आकडे हटवण्यात आले आहेत.
अनधिकृतपणे वीजवापर करणार्यांमुळे वीज वितरण यंत्रणेवर येणारा ताण कमी व्हावा, यासाठी आकडेबहाद्दरांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार पालघर विभागातील बोईसर ग्रामीण, डहाणू, जव्हार, पालघर, सफाळा, तलासरी, विक्रमगड व मोखाडा या उपविभागांमध्ये अधिक तीव्रतेने ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत बोईसर ग्रामीणमध्ये 126, डहाणू येथे 267, जव्हारमध्ये 65, पालघरला 115, सफाळा येथे 87, तलासरीला 187, विक्रमगडमध्ये 85 व मोखाडा येथे 89 असे एकूण 1021 आकडे हटवण्यात आले आहेत.
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंते, अधिकारी, शाखा अभियंते, जनमित्र व कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. ही मोहीम अधिक तीव्रपणे राबवण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत विजेचा अनधिकृत वापर खपवून घेतला जाणार नसल्याची माहिती इशारा कार्यकारी अभियंता मचिये यांनी दिला आहे.