। ठाणे । वार्ताहार |
ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील वीर सावरकरनगर परिसरात असलेल्या सिद्धिविनायक चाळीत एका 11 वर्षाच्या मुलाला वीजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकाराची नोंद वर्तक नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अलोक चकवे (11) असे मृत मुलाचे नाव आहे. तो शनिवारी दुपारी घराबाहेर असताना त्याचा हात घराजवळ असलेल्या लोखंडी जिन्याला लागला. या जिन्यातून त्याला विजेचा धक्का लागून तो जागीच बेशुद्ध पडला. हा विजेचा धक्का घराबाहेरील लोखंडी जिन्या शेजारी असलेल्या विद्युत वाहिन्यांच्या बिघाडामुळे झाला असल्याचा अंदाज तेथील नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. अलोकला विजेचा धक्का लागताच त्याला ठाणे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा विजेचा धक्का नक्की कसा लागला याचा तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.