महावितरणच्या दुर्लक्षामुळे १२ गावे अंधारात

ग्रामस्थ आक्रमक, चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित
| मुरूड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील असलेली गावे गोपाळवट, फणसवाडी, वाघीरपट्टी, मसाडी, कांटी, केळघर, वांडरखोंडा, साटलेवाडी, आराळी, खडकी, वांदरखोंड या दहा ते बारा गावांचा वीजपुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडित झाल्याने वीज ग्राहक पुरते हैराण झाले आहेत. रोहा महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने दरवेळी अशा प्रकारे अनेक दिवस वीजप्रवाह खंडित होत असतो, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन रोहा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुवार, दि. 14 जुलै रोजी या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, गेले शंभर तास उलटून गेले तरी वीजप्रवाह सुरू झाला नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेक वेळा रोहा महावितरणच्या कर्मचार्‍यांना फोन केला असता एक तासात, दोन तासात लाईट येईल असे सांगत असून, शंभर तास उलटून गेले तरी विजेचा पत्ता नाही, अशी माहिती फणसवाडीचे ग्रामस्थ गोविंद हिरवे यांनी दिली.

ही गावे अत्यंत दुर्गम डोंगर भागात वसलेली असल्याने महावितरण या गावांच्या वीजपुरवठ्याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याने येथील ग्रामस्थांना नेहमीच अंधारात राहावे लागते. तरी याकडे तातडीने लक्ष देऊन या ठिकाणच्या गावांचा खंडित होत असलेला वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी या ठिकाणच्या ग्रामस्थांची मागणी आहे.
यासंदर्भात रोहा महावितरण अभियंत्यांशी संपर्क केला असता करतो, लवकरच वीज येईल एवढे उत्तर मिळते.

Exit mobile version