४० पुलांची पाहणी तर ४ चार छोट्या पुलांची नव्याने पुनर्बांधणी
| पेण | प्रतिनिधी |
राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून पेण तालुक्यातील एकूण ४० पुलांची पावसाळयापूर्वी पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये ९ मोठे आणि ४ लहान असे तब्बल १३ पूल धोकादायक आढळले आहेत. त्यामुळे पुलांच्या बाबतीत आणि येथील नागरिकांच्या बाबतीत प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. या १३ पुलांची धोकादायक पूल म्हणून नोंद करण्यात आली असून, २ मोठया पुलांचे, तर ४ लहान पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. यापैकी चार लहान पुलांची नुकतीच नव्याने पुनर्बांधणी जरी करण्यात आली असली, तरी उर्वरित धोकादायक पुल यंदाच्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे.
दोन कोटी रुपये खर्च करून पुनर्बाधणी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पाच मोठे आणि चार लहान पुलांपैकी जे चार लहान पूल धोकादायक ठरले होते त्यांची पावसाळयापूर्वीच अंदाजे दोन कोटी रूपये खर्च करून पुनर्बाधणी करण्यात आली आहे. तर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत असलेल्या पेण-खोपोली मार्गावरील बाळगंगा नदीवरील पुल सुस्थितीत असून याच पुलाच्या बाजूने नव्या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. तालुक्यातील शिर्की पूल हे अत्यंत धोकादायक असून या पुलाशी पुढे जवळपास 15 गावांचा संपर्क येत असतो. त्यामुळे सुमारे 10 ते 12 हजार लोकवस्ती असणार्या या भागाला धोकादायक पुलामुळे सतर्क राहावे लागणार आहे.
दोन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट
पेण शहराला लागून असणार्या भोगावती नदीवरील भुंडा पूल आणि तालुक्यातील मोहाडी ठाकूरवाडी या दोन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत जे ९ धोकादायक पूल घोषित करण्यात आले आहेत त्यांच्या पुनर्बांधणी आणि डागडुजीसाठी जवळपास ५ कोटी 20 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. मात्र यंदाच्या पावसाळयात या धोकादायक पुलांची बांधणी शक्य नसल्याने अतिवृष्टी आणि महापुराच्या दरम्यान प्रशासन आणि येथील नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे. शिर्की पूलाची पुढल्यावर्षी नक्कीच पुनर्बाधणी केलेली असेल. असा विश्वास नाईक, उपअभियंता, जि.प.बांधकाम विभाग यांनी दिला आहे.
आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणार्या तालुक्यातील सर्व पुलांची पाहाणी केली असता, दादर, वाशेणी, रावे, कोपर आणि निगडे हे पाच मोठे पूल सुस्थितीत असून सावरोली-खारपाडा मार्गावरील चार लहान धोकादायक पुलांची दोन कोटी रूपये खर्च करून नव्याने पुनर्बाधणी केली आहे. त्यामुळे आता आमच्या अखत्यारितील सर्व पूल सुस्थितीत आहेत.
डी.एम. पाटील, उपविभागीय अभियंता, सा.बां.विभाग
नऊ पुलांपैकी भुंडा पुल, दादर वसेनी पुल, खारपाडा सावरोली पुल या पुलांवर कित्येक वेळा लाखो रुपये खर्च केले आहेत. परंतु दर दोन वर्षांनी ही पुल धोकादायक म्हणून घोषित केली जातात. कारण पुलांची डागडुजी व पुनर्बांधणी ही फक्त कागदावरच होत असते. गेल्या पाच वर्षात पुलांवर झालेल्या पैशाचा ऑडिट रिपोर्ट केल्यास निधीचा दुरुपयोग कसा केला आहे. हे सर्व सामान्यांना लक्षात येइल.
स्वप्निल म्हात्रे, पेण तालुका, लाल ब्रिगेड अध्यक्ष