मालवणीत ३ जणांची हत्या; ४ आरोपींना अटक

। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील मालवणी परिसरात गेल्या तीन दिवसांत तीन खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. गेले काही काळ मुंबईच्या मालवणीत मागील 15 दिवसांत 4 जणांची हत्या झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहे. परिणामी संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना उघडकीस आली 14 जुलै रोजी जेव्हा मढ बेटावरील एका लॉजमध्ये प्रेयसीचा प्रियकराने खून केला होता. मालवणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून सध्या या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत. दुसरी हत्या 15 जुलै रोजी मालवणी गेट क्रमांक 8 येथे वस्तीत घरात राहत असलेल्या पती-पत्नीमध्ये भांडण झाले. भांडण विकोपाला गेले आणि रागात पतीने मसाला ग्राइंडरने 48 वर्षीय पत्नीची हत्या केली, घटनेनंतर मालवणी पोलिसांनी आरोपी महिलेच्या पतीला अटक केली.

तिसरी हत्या शनिवारी 16 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता तौफीक खान हा मालवणीतील रहिवासी अंबोजवाडी परिसरात शौचास जात होता, त्याचवेळी 16 वर्षीय व्यक्तीशी जाताजाता बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर दोघांमध्ये वादात झाले, आणि आरोपींनी तौफीक खानवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. या घटनेत एका 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीलाही मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. चौथी हत्या 15 दिवसांपूर्वी मालवणीमध्ये एका अल्पवयीन मुलाची करण्यात आली होती. मालवणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली होती. तीन दिवसांत तीन खून आणि पंधरा दिवसांत एकूण चार हत्या झाल्यानंतर मालवणी परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे एकामागून एक चार खून झाल्यानंतर आता मालवणी पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता मालवणी परिसरात दररोज होणार्‍या हत्याकांडांना पोलीस कसे आळा घालतात हे पाहावे लागेल.

Exit mobile version