| अलिबाग | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यातील 302 एसटी बसेसने चार लाख किलो मीटरचा प्रवास केला आहे. त्यामुळे या बसेला मुंबईत प्रवेश दिला जात नाही. मुंबईतील प्रदुषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे धुर ओकणाऱ्या या बसेस रायगडमधील रस्त्यावर धावत आहेत. वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती आहे. त्याकडे महामंडळाने लक्ष देऊन नवीन बसेस देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
एसटी महामंडळ रायगड विभागात अलिबाग, पेण, कर्जत, महाड, माणगाव, श्रीवर्धन, मुरूड व रोहा असे आठ एसटी बस आगार असून 19 बस स्थानके आहेत. जिल्ह्यात 480 एसटी बसेस आहेत. त्यात शिवशाही, निमआराम व साध्या बसेसचा समावेश आहे. एसटीतून दिवसाला सुमारे एक लाख प्रवासी प्रवास करीत असून एसटीला दिवसामागे सुमारे 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शहरी भागासह ग्रामीण भागात खेड्यापाड्यात एसटी धावत असल्याने त्याचा फायदा ग्रामीण भागातील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना तसेच तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो.
जिल्ह्यात खासगी वाहनांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहने खरेदी खरेदीदेखील वाढू लागली आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात तग धरून ठेवण्यासाठी एसटी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे एसटीकडे प्रवासी आकर्षित होऊ लागले आहेत. यातून एसटीला उत्पन्न मिळत आहे. रायगड विभागातील 480 एसटी बसेस पैकी 302 एसटी बसेसने चार लाख किलो मीटरचा प्रवास केला आहे. त्यातून धुर निघत असल्याने या एसटी बसला मुंबईमध्ये प्रवेश दिला जात नाही. मोठ्या शहरातील प्रदुषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या एसटी बसेस जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाठविल्या जात आहेत.
पर्यावरणाचे संवर्धन राखण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था, पर्यावरणाचा संदेश देऊन प्रबोधन करण्याचे काम करीत आहेत. प्रदुषण रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. मात्र, त्याकडे सरकारचे पाहिजे तसे लक्ष नसल्याचे समोर आले आहे. ज्या बसमधून सर्वसामान्य प्रवासी प्रवास करतात. त्याच बस रस्त्यावर मोठया प्रमाणात धुर ओकत आहे. तरीदेखील बस रस्त्यावर धावत असतात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग मात्र पर्यावरणाच्या विषयावर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील रस्त्यांवर या बसेस धावत असल्याने वायू प्रदुषणामुळे रायगडकरांच्या जिवाशी खेळ होत असल्याची भिती निर्माण झाली आहे.
300हून अधिक एसटी बसेसने चार लाख किलो मीटरचा प्रवास केला आहे. आरटीओच्या नियमानुसार त्या मुंंबईत पाठविल्या जात नाही. त्यामुळे या बसेस रायगड व अन्य ठिकाणी पाठविल्या जात आहेत. या बसेची देखभाल दुरुस्ती कार्याशाळेच्या माध्यमातून वेळोवेळी केली जाते. धुर ओकणाऱ्या व खराब झालेल्या गाड्या भंगारात पाठविल्या जातात.
दिपक घोडे, विभाग नियंत्रक,
रायगड महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
75 बसेस चार लाख किमी खालील रायगड जिल्ह्यातील 302 एसटी बसेसने चार लाख किमी प्रवास केल्याने त्या मुंंबईमध्ये पाठविल्या जात नाही. त्यामुळे आणखी 75 बसेसची त्यामध्ये भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या 75 बसेसने चार लाख किलो मीटरपेक्षा कमी प्रवास केला आहे. त्या लवकरच चार लाख किलो मीटरचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.