परतीच्या प्रवासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कैलास मानसरोवर यात्रेसाठी रायगडसह महाराष्ट्रातील विविध भागांतून नेपाळमार्गे गेलेले 37 भाविक सध्या सुखरूप असून, परतीच्या प्रवासासाठी त्यांची काठमांडूकडे रवानगी करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नेपाळमध्ये बुधवारी (दि. 26) निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भाविकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून सातत्याने माहिती घेतली जात आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व 37 भाविक सध्या तिबेटमधील सागा येथे सुरक्षित होते. परतीच्या प्रवासात सागा येथे अडकलेल्या भाविकांशी प्रशासनाचा सातत्याने संपर्क होता. त्यांची काठमांडूहून शनिवारी (दि. 29) दुपारी दोन वाजता परतीची विमानसेवा नियोजित असल्याने त्यांना वेळेत काठमांडू येथे पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर आवश्यक समन्वय साधत सागा येथून न्यालम मार्गे या भाविकांना काठमांडूकडे सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. नेपाळ प्रशासनाकडूनही भाविकांना आवश्यक मदत व सहकार्य करण्यात येत आहे.
या 37 भाविकांच्या कुटुंबीयांशीही रायगड जिल्हा प्रशासन संपर्कात असून, सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे. भाविकांचा परतीचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक समन्वय व देखरेख ठेवण्यात येत आहे. भाविकांच्या सुटकेसाठी तातडीने मदत मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे भाविकांनी आभार मानले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.
पर्यटकांची माहिती प्रशासना द्या
नेपाळमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील कोणताही पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकला असल्यास किंवा त्याचा कुटुंबियांशी संपर्क होत नसल्यास संबंधित पर्यटक अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, रायगड : 8275152363, 02141-222118/02141-222097 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
37 भाविकांची नावे
प्रमोद दिनानाथ केणे, शशिकांत पांगांवकर, दत्तात्रेय जोशी, हेमंत मुकुंद दांडेकर, नितीन बाळकृष्ण गांधी, दिनेश गांधी, बजरंग परब, संतोष अलूरकर, समीर अशोकराव घोडेराव, राकेश ज्ञानेश्वर जितेकर, श्रीकांत धावळे, सुरेंद्र जोशी, श्रीकांत कृष्णा पाटील, आदित्य राजन देशमुख, नितीन सूर्यकांत शिर्के, संजय पांडुरंग देशपांडे, विवेक अरविंद पांडे, सोनाली बेलोसय, सुनिता पांगांवकर, स्नेहा अस्वद कुलकर्णी, सुवर्णा रविंद्र जोशी, वृषाली अभिजीत पुराणिक, रश्मी सेठ, पूनम साबनीस, शमा साठे, रेणुका अलूरकर, आरती विनायक काकर्मठ, अपर्णा अशोक कदम, माधवी जोशी, रुचा श्रीकांत पाटील, सोनल जोशी, सीमा शिंपी, हेमलता दत्तात्रय बोर्से, अंजना राजन राजपूत, संगिता संजय देशपांडे, स्नेहा विवेक पांडे, वर्षा कारी.





