7 मे रोजी निवडणूक कर्तव्यावर; 15 जूनपासून उघडणार शाळा
| रायगड । सुयोग आंग्रे ।
रायगड जिल्हा परिषदेसह महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा याच आठवड्यात संपणार आहेत. त्यानंतर शिक्षकांना (दि.5) मेपर्यंत शाळेत यावे लागणार आहे. तर लोकसभा निवडणुकीमुळे शिक्षकांना (दि.8) मेपासून उन्हाळी सुट्या लागतील. यंदा शिक्षकांना 38 दिवसांची उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. 2023-24च्या शैक्षणिक वर्षातच इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेतली जात आहे. त्यात दोन्ही इयत्तेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एका महिन्यानंतर परीक्षा घेतली जाईल. त्यावेळी पण एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे. सरसकट पास करण्याची पद्धत इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी आता बंद झाली आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत, त्यांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. ज्या शाळांच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांना चालू आठवड्यात परीक्षा संपविण्याचे आदेश शिक्षणाधिकार्यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या तरी मुख्याध्यापक व शिक्षकांना पुढील शैक्षणिक वर्षीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ‘आरटीई’ अंतर्गत 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया अजून सुरु न झाल्याने शाळांना तोवर उर्वरित 75 टक्के प्रवेश पूर्ण करून घ्यावे लागणार आहेत. शाळांनी आता त्याची तयारी सुरू केली आहे.
ठळक बाबी... एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात संपणार परीक्षा निवडणुकीमुळे 8 मेपासून उन्हाळी सुट्या 1 मे रोजी विद्यार्थ्यांना मिळणार निकालपत्र 15 जूनपासून पुन्हा सुरु होतील शाळा दोन दिवस तयारीसाठी शाळेत यावे लागणार
2023-24 या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुट्या शाळांना 6 मेपासून लागणार आहेत, पण लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान असल्याने 8 मेपासून सुट्या लागतील. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आठवड्यात संपतील. त्यांची परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जात आहेत.
पुनिता गुरव ,
प्राथमिक शिक्षणाधिकारी,
जिल्हा परिषद, रायगड