आरसीएफ कंपनीत कंत्राटी कामगार भरतीवर भर
लवकरच सुरु होणार थळमध्ये नव्या खत उत्पादनाचा प्रकल्प
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ प्रकल्पामध्ये नवा एनपीके (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम) खत उत्पादन प्रकल्प उभारला जात असून सुमारे 900 कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येत आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली मुख्य अन्नद्रव्ये पुरविणारे खत तयार करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात असून खतांच्या वाढत्या मागणीचा विचार करून थळमध्ये औद्योगिक विस्ताराचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मात्र एवढ्या मोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पातून फक्त 30 जणांनाच कायमस्वरूपी नोकरी मिळणार असल्याची माहिती समोर येत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हजारो कोटींच्या प्रकल्पातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, अशी अपेक्षा असताना बहुतांश कामे कंत्राटी पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे थळ आणि परिसरातील नागरिकांकडून स्थानिकांना प्राधान्याने कायमस्वरूपी रोजगार द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. औद्योगिक प्रकल्प उभारले जात असताना स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्नही सोडविणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
आरसीएफ अर्थात राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्स लिमिटेड ही भारत सरकारची एक प्रमुख नवरत्न सार्वजनिक उपक्रम कंपनी म्हणून ओळखली जाते. अलिबाग तालुक्यातील थळ येथे सातशे एकर क्षेत्रामध्ये युरिया खत निर्मिती करणारा प्रकल्प या कंपनीमार्फत चालविला जात आहे. खत निर्मिती प्रकल्पाचे काम होत असताना सामाजिक जबाबदारीतून या प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहे. ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, शिक्षण, फिरते दवाखाना, शासकीय प्राथमिक, आरोग्य केंद्रासह जिल्हा रुग्णालयांना मदतीचा हात देण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. थळ येथील कंपनीच्या क्षेत्रात आणखी एक नवा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे देशातील संमिश्र खतांच्या उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. या औद्योगिक प्रकल्पामुळे स्थनिक पुरक उद्योगांना चालना, प्रादेशिक आर्थिक विकास व देशाच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पिकांची लागवड केली जाते. तसेच भाजीपाला व अन्य पिकांची लागवड करण्यावर भर दिला जात आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य अन्नद्रव्य पुरविणारा हा प्रकल्प असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळाचा गरज कमी
थळ येथील आरसीएफ कंपनीच्या जागेमध्ये सुमारे पाच एकर जागेमध्ये एपीके अर्थात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशिअम खत प्रकल्प उभा राहणार आहे. हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर अधारित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 900 कोटी रुपयांचा खर्च आहे. या प्रकल्पाचे काम युध्द पातळीवर सुुरू आहे. या प्रकल्पामध्ये 30 जणांना कायम नोकरी असणार असून अन्य जणांना कंत्राटी स्वरुपात नोकरी प्राप्त होणार आहे. हजारो हातांना या प्रकल्पाच्या माध्यमातून काम मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र हा प्रकल्प होत असताना स्थानिकांना प्राधान्याने नोकरीत सामावून घेण्याबरोबरच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे.
स्थानिकांना रोजगार द्या, शेकापची मागणी
थळ येथील आरसीएफ कंपनीमध्ये कार्यरत असलेले अनेक स्थानिक कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचत आहेत. परिसरातील अनेक तरुण सध्या अभियांत्रिकी, तांत्रिक आणि पदवीधर शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. स्थानिकांच्या जमिनी आणि परिसरावर उभारले जाणारे औद्योगिक प्रकल्प असताना रोजगाराच्या संधींमध्येही स्थानिकांना हक्क मिळालाच पाहिजे. त्यामुळे कंपनीमध्ये निर्माण होणाऱ्या नव्या रिक्त पदांवर स्थानिक तरुणांना प्राधान्याने संधी द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.







