50 टक्के घरे ग्राहकांअभावी रिकामी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआरडीए) न विकल्या गेलेल्या घरांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत आहे. करोना लॉकडाउनमुळे घरांची विक्री मंदावली होती. मात्र आता अनलॉकदरम्यान नव्याने प्रकल्पांची घोषणा होत असल्याने गृहविक्री व्यवसायाला पुन्हा भरभराट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
एमएमआरडीए रिजनमध्ये येणार्‍या दहिसर, पनवेल, कल्याण, भिवंडी, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर सारख्या ठिकाणी न विक्री झालेल्या घरांची संख्या फारच जास्त आहे. मुंबई आणि उपनगर परिसरामधील एकूण न विक्री झालेल्या 2 लाख 81 हजार 601 तयार घरांपैकी 1 लाख 27 हजार 660 म्हणजे जवळजवळ 50 टक्के घरे ही याच भागांमधील आहेत.

ऑगस्ट 2020 पासून घरांची विक्रमी विक्री होत असली तरी विक्री अभावी पडून असलेल्या तयार घरांची संख्याही 17 टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल 2020 च्या सुमारास तयार असलेली सगळी घरं विकली जाण्याचा कालावधी 11 वर्ष होता, जो मार्च 2021 च्या सुमारास चार वर्ष इतका कमी झाला. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये नवनवीन प्रकल्पांच्या घोषणा होत असून पुन्हा एकदा विक्रीअभावी तयार घरं पडून राहण्याचा कालावधी चार वर्ष 11 महिने इतका झाला आहे.
तिसर्‍या लाटेमुळे विक्रीला पुन्हा एकदा ब्रेक लागू शकतो आणि सरासरी विक्रीची संख्या कमी होऊ शकते अशी शक्यता लायसिस फोरासचे कार्यकारी निर्देशक पंकज कपूर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना व्यक्त केलीय. मागील वर्षी घरांची सर्वाधिक विक्री नवी मुंबई, मध्य उपनगरे, पश्‍चिम उपनगरांमध्ये झालीय. नवीन प्रकल्प आल्याने तयार झालेल्या मात्र विक्री न करण्यात आलेल्या घरांची संख्या या भागांमध्ये वाढल्याचं कपूर सांगतात.

Exit mobile version