तीन महिन्यांत 58 मुले बेपत्ता

तब्बल 47 बालिका, 11 बालकांचा समावेश

अलिबाग । भारत रांजणकर ।

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील 28 विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेल्या तीन महिन्यांत तब्बल 47 बालिका, तर 11 बालक गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुले गायब होण्याच्या प्रकाराने पालक चिंतातूर झाले आहेत. यासंदर्भात 53 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देशभरात महिला आणि मुली गायब होण्याचे प्रकार वाढत असून, महाराष्ट्रात तीन महिन्यांत पाच हजारांहून अधिक मुली हरवल्याचे समोर आले. यात रायगड जिल्हादेखील मागे नाही. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात पनवेल आणि उरण तालुका वगळता 13 तालुक्यांचा समावेश आहे. या 13 तालुक्यांमध्ये 28 पोलीस ठाणे आहेत.

अलिबाग, कर्जत आणि नेरळ या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून सर्वाधिक जास्त प्रत्येकी पाच मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर, रोहा, रसायनीमधून चार मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. खालापूर, पेण आणि पाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन मुली गायब झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत. माणगाव, गोरेगाव, नागोठण्यातून प्रत्येकी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. महाड तालुका, महाड शहर, माथेरान, खोपोली, वडखळ, पोयनाड आणि रेवदंडा या पोलीस ठाण्यातून प्रत्येकी एक मुलगी बेपत्ता आहे.

दिलासादायक म्हणजे, पोलादपूर, महाड एमआयडीसी, श्रीवर्धन, दिघी सागरी, म्हसळा, कोलाड, मुरुड, तळा, दादर सागरी आणि मांडवा सागरी या दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकाही मुलीच्या अपहरणाबाबतचा गुन्हा दाखल झालेला नाही.

याच तीन महिन्यांत 11 बालक गायब झाल्याचे गुन्हेदेखील नोंद आहेत. यात कर्जतमध्ये तीन, रसायनीतून दोन तर रोहा, कोलाड, नेरळ, खोपोली, पेण आणि रेवंदडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक बालक गायब झाल्याची नोंद आहे. एकूण 58 अल्पवयीन मुले-मुली गायब असल्याने त्यांच्या शोध लावण्याचे मोठे आव्हान रायगड पोलीस दलावर आहे.

Exit mobile version