देशातील 70 टक्के हॉटेल्सना लागणार टाळे?

कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर गेल्या दीडवर्षांपासून घोंघावत आहे. या महामारीने अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण केली आहे. कोरोनाचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्थाही सध्या संथ गतीने पुढे जात आहे. कोरोना काळात देशातील अनेक उद्योग-धंदे बंद पडले किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सेवा क्षेत्रावरही याचा प्रभाव पडला आहे. हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्राथमिक डेटानुसार, कोरोनाचा गंभीर परिणाम सेवा क्षेत्रावर पडला आहे. असोसिएशनच्या माहितीनुसार, 40 टक्क्यांपेक्षा अधिक हॉटेल्स बंद पडले आहेत आणि जवळपास 70 टक्के छोटे हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

2020 च्या सुरुवातीपासून कोरोना महामारीला सुरुवात झाली. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉराँ, मॉल्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही प्रमाणात ते पुन्हा सुरु करण्यात आले. पण, लगेच दुसर्‍या लाटेचे संकट समोर उभे राहिले. लॉकडाऊनच्या धक्यातून उद्योग-धंदे सावरु शकलेले नाहीत. हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, हॉटेल व्यवसाय धोक्यात आला आहे. निर्बंध असेच सुरु राहीले तर 70 टक्के हॉटेल्स बंद पडू शकतात.

नेमकं किती नुकसान झालंय ते सांगता येत नाही, पण प्राथमिक माहितीनुसार 40 टक्के हॉटेल्स बंद पडले आहेत आणि 70 टक्के हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यात विशेष करुन छोट्या हॉटेल्सचा समावेश आहे. छोट्या हॉटेल्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरच निर्बंध हटवण्यात आले नाहीत. तसेच हॉटेल क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी काही पाऊलं उचलण्यात आली नाहीत, तर मोठे संकट ओढावेल, असं हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव एमपी बेझबारुह म्हणाले.

असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. कोसळण्याच्या वाटेवर असलेल्या सेवा क्षेत्रासाठी मदत निधी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्जाची एकरकमी परतफेड, कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ, सरकार घेत असलेल्या करांमध्ये सवलत, कर्मचार्‍यांसाठी पॅकेजची घोषणा अशा काही मागण्या हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाकडून करण्यात आली आहे.

Exit mobile version