| उरण | वार्ताहर |
तालुक्यात होवू घातलेल्या चिरनेर, दिघोडे व जासई या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या तीनही ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी एकदिलाने कामाला लागली असून महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या या तीनही ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी एकहाती विजय संपादन करणार असल्याचे चित्र आहे.
उरण मतदार संघात सध्या भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार असला तरी या मतदार संघात शिवसेना, शेकाप, काँग्रेस या इंडिया आघाडीचे प्राबल्य आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीने एकदिलाने लढण्याचा निर्धार करून चिरनेरमध्ये शिवसेनेला सरपंचपदांची उमेदवारी दिली आहे, तसेच दिघोडेमध्ये काँग्रेसला तर जासईत शेकापला उमेदवारी दिली आहे. चिरनेरमध्ये शिवसेनेचे भास्कर मोकल, दिघोडेमध्ये काँग्रेसचे किर्तीनिधी ठाकूर, तर जासईत शेकापचे संतोष घरत यांना सरपंच पदासाठी उमेदवारी दिली आहे. सदस्य पदासाठी महाविकास आघाडीने योग्य पद्धतीने जागा वाटप केल्याने कार्यकर्ते सुद्धा जोमाने प्रचारात उतरले आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत तर शेकापचे आमदार बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत दैदिप्यमान यश संपादन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चिरनेर ग्रामपंचायतीमध्ये 15, दिघोडेत 9 तर, जासईत 17 जागांसाठी निवडणुकीचा फड रंगणार आहे. तर सरपंच जनतेतून थेट निवडला जाणार आहे. जासईचे शेकापचे उमेदवार संतोष घरत यांनी या अगोदर दोन वेळा सरपंच पद कार्यक्षमपणे भूषविले आहे. दिघोडेचे सरपंच पदासाठी असणारे काँग्रेसचे उमेदवार किर्तिनिधी ठाकूर हे गेली दहा वर्षे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य म्हणून काम करीत आहेत. चिरनेर सरपंच पदासाठी असणारे शिवसेनेचे भास्कर मोकल हे उरण पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीचे हे तगडे उमेदवार भाजपाचे नवखे आव्हान सहज परतवून लावतील असे बोलले जात आहे. तीनही ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व असल्याने भाजपाला सहज पराभूत करू असा विश्वास संतोष घरत यांनी व्यक्त केला आहे.