विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली सभागृहात मागणी
| नागपूर | प्रतिनिधी |
राज्यात मागील आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे 22 जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्राच मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. शेडनेट व पशुधनाचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यासाठी कोणत्याही विम्याची तरतूद नाही. त्यामुळे शेडनेट व पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. अवकाळी व गारपीट झाल्यावर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील, अस अभिवचन दिलं होतं. मात्र पोखरा योजनेतून उभारल्या जात असलेल्या शेडनेटसाठी कोणतीही मदत दिली जात नसल्याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
शेडनेट उभारणीसाठी बँक व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र ते वादळी वाऱ्यात हे शेडनेट वाहून गेल्यावर त्याच्या नुकसान भरपाईसाठी कोणताही विमा नाही. त्यामुळे शेडनेट नुकसान भरपाईसाठी येत्या काळात मदत देण्याची बजेटमध्ये तरतूद करावी, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली. तशाच प्रकारची स्थिती ही पशुधन नुकसानी बाबतही आहे. त्यामुळे त्यासाठी नुकसान भरपाईची येणाऱ्या काळात सरकारने व्यवस्था करावी, अशी मागणी दानवे यांनी सभागृहात लावून धरली. त्यावर उपमुख्यमंत्री यांनी याबाबत लाभार्थ्यांना विम्याची योजना करता येईल, याबाबत मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले असल्याची माहिती दिली.