18 गावे आणि 60आदिवासी वाड्या पाणीटंचाई ग्रस्त.. आराखडा तयार
| नेरळ | वार्ताहर |
दुर्गम भाग असलेल्या कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील पाणीटंचाईला सामोरे द्यावे लागणार आहे. यावर्षी कर्जत तालुक्यातील 18 गावे आणि 60 आदिवासी वाड्या यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवणार आहे. दरम्यान, यावर्षी पाणीटंचाई अधिक जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुका आदिवासी तालुका असून दुर्गम भागात वसलेल्या या तालुक्यातील उल्हास नदी वगळता अन्य नद्या उन्हळ्यात कोरड्या राहतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिना सुरु झाला कि पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आरखडा तयार करण्यात येतो. त्या कृती आराखड्यानुसार कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे आणि ट्रँकरने पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात.यावर्षी कर्जत तालुक्यात 20 गावे आणि 60 आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई असून तेथे ट्रँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्यावर ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने 39 लाख 50 हजाराचा निधीची तरतूद केली आहे.
कर्जत तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आमदार यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या पाणीपुरवठा कृती समितीकडून पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा बनविला आहे. आमदार तसेच तालुक्याचे तहसीलदार, कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा उपअभियंता या अधिकाऱ्यांनी हा आरखडा तयार केला आहे. तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जुन्या विहिरी खोल करणे आणि त्यातील गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे. नवीन विंधन विहिरी खोदणे, विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, विंधन विहीर जलभरण करणे, आणि बैलगाडी तसेच टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्याला एक कोटी 53 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. तालुक्यात मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अँभेरपाडा, मोहोपाडा, सुतारपाडा, गरुडपाडा कळंब, अंथराट निड, किरवली भीमनगर, खांडस, ओलमण, बोंडेशेत, आशाने, चेवणे, ढाक, तुंगी, पेठ आणि अंथराट वरेडी या 19 गावातील नळपाणी योजना आणि तेथील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन या सर्व गावांचा समावेश पाणीटंचाई ग्रस्त गावांमध्ये करण्यात आला आहे.
तर कर्जत तालुक्यातील भोपळेवाडी, आनंदवाडी, भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, पादिरवाडी, मेचकरवाडी,चौधरवाडी, जांभूळवाडी मोग्रज, बांगरवाडी, पेटारवाडी, काठेवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, बनाचीवाडी, बेलाचीवाडी, भागूची वाडी एक आणि दोन, मेंगाळवाडी, चिमटेवाडी, विठ्ठल वाडी, तेलंग वाडी, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूरवाडी, हऱ्याचीवाडी, विकासवाडी, आषाने ठाकूरवाडी, नागेवाडी पाथरज, जांभुलवाडी वारे, बोरीचीवाडी कळंब, चिंचवाडी, मिरचुलवाडी कळंब, काळ्याची वाडी, पाली धनगर वाडी, आसलवाडी, नाण्याचा माल, आसल धनगरवाडा, सागाचीवाडी, भूतीवलीवाडी, धामणदांड, ठोंबरवाडी, कळकराई, बेकरे वाडी, खांडपे माणगाव ठाकूर वाडी, स्टेशन ठाकूरवाडी, वारे नवसूचीवाडी, पाषणे खाड्याचापाडा मधलीवाडी, चाहूचीवाडी, मिरचोलवाडी, भोमलवाडी, नांदगाव विठ्ठलवाडी, नारळवाडी, दामत कातकरीवाडी, पाच खडकवाडी, ठोंबरवाडी, रजपे कातकरी वाडी आदी ठिकाणी पाणीटंचाईची स्थिती मार्च पासून उद्भवणार आहे.त्यामुळे या सर्व आदिवासी वाड्यांचा समावेश पाणीटंचाई कृती समिती यांनी त्या त्या ठिकाणी पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.