रघुराम राजन यांची पंतप्रधान मोदींवर टीका
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 रोजी भारत विकसित राष्ट्र बनलेले असेल असे ध्येय ठेवले असून, ते मूर्खपणाचे आहे, अशी टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली. जर देशातल्या मुलांना माध्यमिक शिक्षण मिळत नसेल, अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यापासून वंचित राहत असतील, तर हे ध्येय गाठता येणार नाही. आपल्याकडे प्रचंड मनुष्यबळ आहे. पण, या मनुष्यबळाच्या हाताला काम दिले नाही, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे भारताला सर्वात आधी या मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करून त्यांना काम करण्यासाठी तयार करावे लागेल आणि त्यानंतर त्यांना रोजगारही उपलब्ध करून द्यावा लागेल, असे रघुराम राजन यांनी स्पष्ट केले.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या प्रगतीबाबत सध्या जो डंका पिटवला जातोय, त्याबद्दल काळजी व्यक्त केली. अशा अवाजवी जाहिरातीमुळे खरी प्रगती झाकोळली जाते, असेही ते म्हणाले. भारताचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होत आहे, असा विश्वास निर्माण करून त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात येत आहे. अशी जाहिरात करून भारत सर्वात मोठी चूक करत आहे. सर्वप्रथम भारताला महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करावे लागेल, त्यानंतरच भारत शाश्वत विकासाच्या दृष्टीने पुढे जाऊ शकतो, असे प्रतिपादन रघुराम राजन यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पक्षाचे सरकार येईल, त्यांना सर्वप्रथम आपल्या देशातील मनुष्यबळाचे शिक्षण आणि कौशल्य विकास यावर काम करावे लागेल. हे जर केले नाही, तर भारताला आपल्या तरूण लोकसंख्येचा काहीही लाभ होणार नाही, असेही ते म्हणाले.