बाजारपेठेत प्रचंड वाहतूक कोंडी
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन नगरपरिषदेने गावठी भाजी विक्री करणार्या महिलांसाठी दादर पुलावरती प्रशस्त असे मार्केट बांधून दिलेले आहे. परंतु, गावठी भाजी व फळे विक्री करणार्या महिला या सदर मार्केटमध्ये बसत नसून रस्त्यावर बसत आहे. त्यामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वारंवार होत असते. ओले काजूगर, करवंदे, कैरी, आंबा इत्यादी विक्री करणार्या महिला आता नव्याने त्या ठिकाणी बसत असल्याने पादचार्यांना रस्त्यावरून चालणेदेखील मुश्किल होऊन बसले आहे.
नगरपरिषदेने बांधलेल्या मार्केटमध्ये नेहमीच शुकशुकाट पाहायला मिळतो. त्या ठिकाणी कोणत्याही भाजीविक्रेत्या महिला भाजी विक्री करण्यासाठी बसलेल्या पाहायला मिळत नाहीत. सदर भाजी विक्री करणार्या महिलांचा एकच समज आहे की, आम्ही जेवढे रस्त्यावर पुढे बसू, तेवढ्या प्रमाणात आमची भाजी जास्त संपेल. परंतु या महिला रस्त्यावर बसल्यामुळे श्रीवर्धनमधील सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. श्रीवर्धन शहरात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी केवळ एकच वाहतूक पोलीस तैनात आहे. सदरचा वाहतूक पोलीस हा श्रीवर्धन शहराच्या प्रवेशद्वारावर किंवा शिवाजी चौक या ठिकाणीच उभा असतो.
प्रत्यक्षात ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, त्या ठिकाणी कोणीही पोलीस हजर असलेला पाहायला मिळत नाही. जर श्रीवर्धन शहरात एकच वाहतूक पोलीस तैनात आहे, तर स्थानिक पोलीस ठाण्याने एखाद होमगार्ड किंवा कॉन्स्टेबल यांची नेमणूक बाजारात वाहतुकीच्या नियमनासाठी करण्याची गरज आहे. सदर रस्त्यावरती बसणार्या महिलांवर नगरपरिषदेकडून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. नगरपरिषदेचे अधिकारीच कधी बाजारपेठेत फिरताना आढळून येत नाहीत.
भाजी विक्रेत्या महिलांसोबतच श्रीवर्धन शहरातील मुख्य प्रश्न आहे तो रस्त्याच्या दुतर्फा वेड्यावाकड्या उभ्या केल्या जाणार्या दुचाकी. सदर दुचाकी स्वारांवरती दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. वेड्यावाकड्या दुचाकी उभे करून अनेक जण बाजारात खरेदीसाठी किंवा सलूनमध्ये दाढी करण्यासाठी बसून जातात. वाहन चालक मात्र हॉर्न वाजवून वाजवून शेवटी गाडीतून उतरून सदर दुचाकी स्वतः बाजूला करून रस्ता मोकळा करून घेतात. तरी श्रीवर्धन नगर परिषदेने रस्त्यावर भाजी विकणार्या महिलांवरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच पोलिसांनीदेखील दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची गरज आहे.