। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशी येथे जिओ नेटवर्क संथ गतीने तसेच वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा संवाद करताना आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. जिओच्या महागड्या प्लॅनवर खर्च केलेले पैसे देखील अनाठायी वाया जात आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान देखील होते. तसेच नुकताच 12 वीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. मात्र, या भागातील विद्यार्थ्यांना आपला निकाल बघण्यासाठी 12 किमी पायपीट करुन पालीला नेटवर्क क्षेत्रात जावे लागले. मुबंईवरून सुट्टीसाठी गावाला आलेले तरुण नोकरदार यांची ऑनलाईन कामे व्यवस्थित होत नसल्यामुळे ते देखील हैराण झाले आहेत. याबाबत जिओ नेटवर्क कंपनीने योग्य ती दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.