| पाताळगंगा | प्रतिनिधी |
पावसाचे आगमन होण्याआधी खेडेगावात वेध लागायचे ते घरावरती असलेले छप्पर व्यवस्थित करण्याचे. यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असायची. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे असल्यामुळे ती कौलेसारखी करण्यासाठी प्रत्येकाची लगबग असायची. परंतु, बदलत्या काळात कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने प्रत्येक व्यक्ती घर बांधताना कौल न वापरता सिमेंटच्या पत्राचा उपयोग करीत आहे. यामुळे मातीची कौल इतिहास जमा होत चालली आहे.
आज शहरासह खेडेगावही बदलत चालले आहे. सिमेंटच्या जंगलांनी घरे व्यापली जात आहेत. खेड्यातील कौलारू घरासह इतरही अनेक बदल होताना आज आपणास पहावयास मिळत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधीच कौलारू घरांची डागडुजी करणे गरजेचे असे यालाच घर फेरणे असे म्हणतात.
आज घर फेरणारे कारागीरही दुर्मिळ झाले आहेत. कौलारू घरे उन्हाळ्यातही गरम होत नाही. यामुळे ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असायची मातीची कौले ही उन्हाचा जाळ स्वत: शोषून ते आपल्या शरीरापर्यंत नैसर्गिक गारवा पोहोचवतात. एसी किंवा कुलरची हवा नैसर्गिक नसल्याने एका मर्यादेनंतर त्यांचे दुष्परिणाम शरीरावर निश्चितच होताना पहावयास मिळत आहे. पण कौलारू घरे उन्हाळ्यात माणसाचे आरोग्य नीट सांभाळून ठेऊन उन्हाळा सुसह्य करत असतात. आजही खेड्यात चार दोन घरे कौलारू दिसतात. मात्र, नवीन घर निर्मितीची कौलारू घरे बंद होत असल्याने हळूहळू अस्तित्वात असणारी कौलारू घरेही नामशेष होत चालली आहेत, हे मात्र निश्चित.