| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील महावितरण कंपनीकडून विद्युत वाहक तारांची व पोलांची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती होत नसल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. याचा नाहकत्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायत हद्दीतील गावे तसेच छोटे मोठे व्यवसायिक यांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांच्याकडून मागणी करुन ही या हद्दीतील जिर्ण झालेल्या विद्युत वाहक तारांची व लोखंडी पोलांची वेळचे वेळी देखभाल दुरुस्ती होत नसल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या घटनेत वाढ होत आहे. त्यातच महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित पणामुळे विद्युत वाहक तारा पडून मुक्या प्राण्यांबरोबर रहिवाशांना ही आपले प्राण गमवावे लागले आहे.
तरी महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी उरण तालुक्यातील जिर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा व सडलेले लोखंडी पोलांची देखभाल व दुरूस्तीची कामे तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.