| रत्नागिरी | वार्ताहर |
गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असून रात्री उशिरापर्यंत मार्ग मोकळा होईल असे रेल्वेच्या कोकण जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.
पेडणे गोवा मालपे या ठिकाणी पूर्वी एकदा असाच प्रकार घडला होता. आता रूळावर खालून पाणी येत आहे.सध्यस्थीतीत गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गमधील काही स्थानकात थांबवून ठेवल्या आहेत तर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे कडून अजूनही कोणतीही अधिकृत माहिती दिली नसून टनेल मध्ये सध्या रेल्वेचे इंजिनिअर गेले असून ते युध्दपातळीवर रेल्वे मार्ग मोकळा होईल असे प्रयत्न केला जात आहे. कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आणि अभियंता मालपे गोवा येथे उपस्थित आहेत. दरम्यान कोकण जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई म्हणाले, रेल्वे प्रवासी वाहतूक लवकरच सुरू करण्यासाठी कोकण रेल्वेचे अभियंता प्रयत्न करत आहेत. तसेच कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक घटनास्थळी पोहोचले आहेत.
कोकण रेल्वेच्या मार्गावर पेडणे बोगद्या मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत असल्याने पेडणे बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे मार्गावरील अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या अन्य मार्गावर फिरवण्यात आल्या आहेत. मुंबईतून (दि.9) रोजी रात्री सोडण्यात आलेल्या रेल्वे गाडी क्रमांक 20111 मुंबई-मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस आणि रेल्वे क्रमांक 12619 लोकमान्य टिळक -मंगलुरु मत्स्यगंधा एक्सप्रेस सावंतवाडी रेल्वे स्थानकापर्यत सोडण्यात येऊन तिथून या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे बाबत माहिती मिळावी या प्रवाशांच्या सुविधेकरिता खालील फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे. रेल्वे बाबत अधिक माहिती मिळावी, या प्रवाशांच्या सुविधेसाठी 0832-2706480 हा दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे.