सुदैवाने जीवितहानी नाही; नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
| खास प्रतिनिधी | रायगड |
महाड तालुक्यातील दासगाव येथील एका घराच्या भिंतीवर दरड कोसळली आहे. मंगळवारी सकाळी अचानक भले मोठे दगड घरावर कोसळल्याने घराचे अतोनात नुकसान झाले आहे. इब्राहिम गुलाम हुसेन शेख यांच्या घराच्या भिंतीवर सदरची दरड कोसळल्याने ते भयभीत आहेत. दरम्यान, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
यातील गंभीर बाब म्हणजे, दासगाव हे दरडग्रस्त यादीतील गाव आहे. असे असताना या ठिकाणी प्रशासनाने त्यांना राहण्याला अटकाव केला नाही का, तसेच अटकाव केला असतानाही संबंधित ठिकाणी नागरिक जीव धोक्यात घालून का राहतात, असा प्रश्न पडला आहे.
2005 साली या गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये 42 जणांना प्राण गमवावा लागला होता. मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या फकीरवाडी येथील मोहल्ल्यात 11 घरे आहेत. पैकी इब्राहिम गुलाम हुसेन शेख यांच्या घराच्या भिंतीवर 23 जुलैला सकाळी सात वाजता भले मोठे दोन दगड कोसळले. तालुक्यात गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील माती खाली आली आहे. त्यातून हे दगड घरावर पडले आहेत. शेख यांच्या घरात एकूण पाच सदस्य आहेत. परंतु, घटना घडली तेव्हा घरामध्ये सून आणि सासरे असे दोघेजण होते. घटना घडताच ते तात्काळ घराबाहेर पडले. प्रशासनाने तात्काळ या ठिकाणाची पाहणी केली.