। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; मात्र या योजनेचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी शासनाने जे नारी शक्ती अॅप उघडले आहे त्या अॅपचा सर्व्हर सतत बंद पडत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यात अडथळा येत आहे. परिणामी, महिलावर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी, सेतू सेवा केंद्र या ठिकाणी महिलांनी गर्दी केली. अनेक महिलांना बँक खाते नाही, आधारकार्ड बँक खात्यासोबत आणि मोबाईल सोबत लिंक नाही अशा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मोबाईलमधील सीमकार्डला रेंज नसल्याने ओटीपी मिळवणे अडचणीचे झाले आहे.