राजकारणी, सनदी अधिकार्यांनी लावली मंत्रालयात फिल्डींग
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावर असलेल्या कुंडलिका आणि जयगड येथील दोन नवीन पुलांच्या बांधकामासाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून ‘अशोका बिल्डकॉन’ कंपनीचे नाव पुढे आले आहे. गेल्या जुलै महिन्यात गुजरात राज्यात काही पूल कोसळले होते. पैकी एक पूल याच अशोका बिल्डकॉन कंपनीने बनवल्याची माहिती आहे. दोन हजार 146 कोटी रुपयांचा ठेका आपल्यालाच मिळावा यासाठी कंपनीने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी प्रभावशाली राजकारणी आणि काही सनदी अधिकारी त्याला बळ देत असल्याची मंत्रालय परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.
कंपनीने जयगड खाडी पुलासाठी 794.85 कोटी आणि कुंडलिका खाडी पुलासाठी 1357.87 कोटी रुपयांचे टेंडर भरले आहे. लवकरच या दोन्ही खाडी पुलांच्या कामाचा नारळ फोडण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असल्याचे बोलले जाते. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
दोन लेन असलेला 4.4 किमी लांबीचा जयगड खाडी पूल रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड नदीवरील तवसल आणि संदेलावगण यांना जोडेल, तर रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीवरील रेवदंडा आणि साळव यांना दोन लेन असलेला 3.8 किमी लांबीचा कुंडलिका पूल जोडेल. या पुलाला रेवदंडा खाडी पूल असेही म्हटले जाते. मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास वेगवान आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. हा महामार्ग 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे, तर 23 ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. हा महामार्ग कोकणातील किनार्यालगतच्या अरुंद गावठाणातून जाणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस सागरी मार्गाची सुरुवात होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होणार आहे.
बिहार राज्यातील पूल कोसळल्यावर कंपनीच्या अधिकार्यांची पोलीस, सीबीआयमार्फत चौकशी झाली होती. बिहार जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात याबाबत प्रकरण सुरु आहे. याआधीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंपनीचा दोन हजार कोटी रुपयांचा ठेका रद्द केल्याचा इतिहास आहे. असे असताना कंपनीवर एवढी मेहरनजर का, असा सवाल केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. नव्याने तयार केलेल्या 498 किलोमीटर लांबीच्या आराखड्यात काही रस्त्यांचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तर, उर्वरित मार्ग दुपदरी आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग विकसित केला जाणार आहे. 33 प्रमुख गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते तयार केले जाणार आहेत. एमएसआरडीसीने रेवस ते रेड्डी या 447 किमीच्या सागरी किनारा मार्गावर आठ खाडी पूल बांधण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने उपरोक्त दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च 2024 मध्ये तीन वर्षांच्या बांधकाम मुदतीसह टेंडर मागवली होती. कमर्शियल टेंडरमध्ये सर्वात कमी बोलीदार म्हणून ‘अशोका बिल्डकॉन’ ही कंपनी पात्र ठरली आहे. टेंडर अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर पुलाच्या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.