| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबई-पुण्यातून कर्जत तालुक्यात येणार्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या चौक-कर्जत या राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केले जात आहे. आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी साधारण 90 कोटी रुपये खर्च केले जात असून, या निधीमधून करण्यात येत असलेले काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील गोगटे यांनी केला आहे.
मुंबई आणि पुण्याकडे वाहने यांच्यासाठी कर्जत तालुक्यात येणार कर्जत-चौक हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम तब्बल 87 करोड रुपयांचे असून, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कामाचा दर्जा ढासळला आहे, असा आरोप सुनील गोगटे यांनी केला आहे. अभियंता असलेले सुनील गोगटे यांनी रस्त्याचे काम संथगतीने होत असल्याबद्दलदेखील शंका उपस्थित केली आहे.







