पी.एन.पी. नाट्यमंदिरातून कलावंतांना संजीवनी; स्व. दादा-भाऊंचा वारसा जपत नवे व्यासपीठ
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमध्ये सुरू असलेला ‘नाट्यप्रभा’ ग्रामीण नाट्यमहोत्सव म्हणजे स्थानिक नाट्यकर्मी, साहित्यिक, कलाकार आणि रसिक प्रेक्षकांसाठी एक सांस्कृतिक पर्वणीच ठरत आहे. पी.एन.पी. कलाविकास मंडळ, अलिबाग यांच्यावतीने आणि चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाने रायगडच्या ग्रामीण रंगभूमीला नवसंजीवनी दिली आहे, असे मत डॉ. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.
कूळ कायद्याचे जनक क्रांतिसूर्य स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी समाजकारण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा वारसा पुढे नेत स्वर्गीय प्रभाकर पाटील (भाऊ) आणि स्वर्गीय दत्ता पाटील (दादा) यांनी राजकारणाबरोबरच शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग आणि रोजगार क्षेत्रात मोलाचे कार्य केले. ग्रामीण भागात व्यायामशाळा, समाजमंदिरे, क्रीडांगणे आणि नाट्यमंदिरे उभारण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. याच कार्यामुळे रायगडातील गावागावांत नाटकांची परंपरा रुजली आणि हजारो कलाकार घडलेत, असेही पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील कलाकारांनी सातत्याने नाटकांमधून विविध भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक कलाकारांनी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय नाट्यस्पर्धांमध्ये यश मिळवले. नाटकांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, अंधश्रद्धा, दारूबंदी, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजजागृतीचे विषय प्रभावीपणे मांडले गेले. ग्रामीण भागात लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, नेपथ्यकार आणि रंगकर्मी यांची मोठी पिढी या चळवळीतून निर्माण झाली.
या परंपरेचा वारसा पुढे नेत माजी आमदार जयंत पाटील यांनी ‘पी.एन.पी. नाट्यमंदिर’ उभारण्याचे स्वप्न पूर्ण केले. पूर्वी अलिबागमध्ये ‘सिद्धराज कलामंदिर’ या तात्पुरत्या रंगमंचावर थंडी, उकाडा आणि डासांच्या त्रासात नाटके पाहणाऱ्या रसिकांना आधुनिक सुविधांनी सज्ज असे भव्य नाट्यमंदिर उपलब्ध झाले. ‘अलिबाग कला विकास मंच’ स्थापून जयंत पाटील यांनी स्वतःच्या व्यवसायातून निधी उभारला आणि अवघ्या दोन वर्षांत ‘पी.एन.पी. नाट्यमंदिर’ साकारले.
दोन वर्षांपूर्वी आगीत नाट्यमंदिराचे नुकसान झाले. मात्र, ‘फिनिक्स’ पक्ष्याप्रमाणे हे नाट्यमंदिर पुन्हा नव्या दिमाखात उभे राहिले. ग्रामीण कलाकारांसाठी हे व्यासपीठ व्यापारी तत्त्वावर न चालवता त्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय भाई जयंत पाटील यांनी घेतला. यानंतर पी.एन.पी. नाट्यमंदिराची धुरा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या हाती सोपविण्यात आली. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या चित्रलेखाताईंनी ग्रामीण कलाकार, साहित्यिक, गायक आणि कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले. ‘साहित्यप्रभा’ अंतर्गत जिल्हास्तरीय कवी संमेलन, राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धा, ‘शिवरत्न भूषण पुरस्कार’ वितरण सोहळा तसेच रोजगार मेळावे यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
18 ते 31 मे 2026 दरम्यान सुरू असलेल्या ‘नाट्यप्रभा’ ग्रामीण नाट्यमहोत्सवात सामाजिक आशय असलेल्या विविध नाटकांचे सादरीकरण होत आहे. ‘गजा आला रे’, ‘स्वप्न सुखाचे पाहताना’, ‘वेड्या भावाची वेडी माया’, ‘दीप तुझ्या वंशाचा’ या नाटकांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आगामी काळात ‘अजून अंधार दाटून आहे’, ‘करमरकर हाऊस’, ‘माझा काय गुन्हा’, ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘विदूषक’, ‘माझं काय चुकलं?’, ‘वेडा वृंदावन’ आणि ‘वारी’ ही नाटके रंगणार आहेत.
प्रत्येक नाट्यप्रयोगानंतर नाट्यसंस्थांचा रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला जात आहे. त्यामुळे कलाकारांना नवी प्रेरणा आणि उभारी मिळत आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील महागड्या नाट्यगृहांमध्ये नाटक पाहण्याचा अनुभव आता अलिबागमध्ये सर्वसामान्य रसिकांनाही मिळत आहे.
यानिमित्ताने जुन्या पिढीतील नाट्यकर्मींचे योगदानही अधोरेखित होत आहे. पेझारी-आंबेपूर येथील स्व. सदानंद पाटील, स्व. नागू म्हात्रे, स्व. हिराजी पाटील, स्व. संभाजी पाटील, स्व. सीताराम पाटील, स्व. काशिनाथ पाटील यांच्यासह राजन पांचाळ, प्रकाश म्हात्रे, प्रकाश पाटील, नंदकुमार पाटील, श्रीकांत पाटील, विजया कुडव, गजानन पाटील, स्व. सदू पाटील, प्रकाश खरसंबळे, जुईली टेमकर, श्रेयाली, चंद्रकांत पाटील, आगरी साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष आणि नाटककार मोहन भोईर तसेच विजू खोटे, शुभा खोटे, जयंत सावरकर, नाना पाटेकर आणि सदाशिव अमरापूरकर यांसारख्या कलाकारांचे योगदान विशेष मानले जात आहे.
या नाट्यमहोत्सवाच्या यशामागे पी.एन.पी. कला विकास मंडळाचे कार्यकारी व्यवस्थापक विक्रांत वार्डे, किशोर म्हात्रे, प्रकल्प वाणी, राजन पांचाळ, प्रतिक पानकर, अमोल नाईक, संदीप जगे, सागर नार्वेकर, देवेंद्र केळुसकर, संकल्प केळकर, दिनेश पाटील, अमोल मिठाग्री, जितेंद्र पाटील, नितेश पाटील, ऋषी पडवळ, अनिष मिठाग्री, यश बनसोडे, अंश म्हात्रे, उपासना घोसाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे परिश्रम मोलाचे ठरत आहेत, असे श्रीकांत पाटील म्हणाले. ग्रामीण रंगभूमीची परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक वारसा जपत ‘नाट्यप्रभा’ महोत्सव रायगडच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय लिहीत असल्याची भावना रसिक प्रेक्षकांकडून व्यक्त होत असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.







