ध्येयवेड्या आशुतोष जोशीची धडपड
। बोर्लीपंचतन । मकरंद जाधव ।
परमेश्वराला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे निसर्ग सुंदर कोकणची रम्यभूमी. एका बाजूला अथांग सिंधूसागर आणि दुसर्या बाजूला खडा पहारा देणारा काळाभिन्न सह्याद्री यांच्यामधला भूभाग म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्याचं लेणं ल्यायलेला आणि जैवविविधतेने नटलेला सुंदर प्रदेश कोकण.
पण गेल्या काही वर्षात विकासाच्या नावाखाली कोकणच्या निसर्गसौंदर्याचं विद्रुपीकरण होत चाललं आहे. इथल्या कोकणी माणसाला विकास हवा पण तो कोकण भकास करणारा नसावा.अशक्यप्रय वाटणारी रेल्वे डोंगर दर्यातून कोकणात पोहोचली पण त्या रेल्वेचा कोकणी माणसाला किती फायदा होतोय? कोकण किनारपट्टीवरच्या गावांचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी रेवस ते रेड्डीपर्यंत प्रस्तावित सागरी महामार्गाची आखणी करण्यात येत आहे. परंतु हा मार्ग कोकणवासीयांसाठी आहे की येथे येणार्या कारखान्यांसाठी आणि उद्योगपतींसाठी? कारण इथली हजारो एकर मोक्याची जमीन राजकीय वरदहस्ताने आधीच विकली गेली आहे. काही जमिनी मजबुरीने त्यांना विकायला भाग पाडल्या त्यामुळे कोकणी माणसाला यातून काय मिळणार? विकास नको आहे असं नाही तर विकासाची व्याख्या कोकणी माणसाला ठरवू द्या.
कोकणचं निसर्ग सौंदर्य उध्वस्त करणारे विनाशकारी प्रकल्प नको तर इथला निसर्ग जपणारे उद्योग म्हणजेच शेती येथे पिकणार्या आंबा,काजू आणि विविध फळप्रक्रिया उद्योग, मसाले उत्पादनं, नारळाच्या झाडापासून निर्माण होणारा काथ्या किंवा तत्सम उद्योग, मत्स्य प्रक्रिया उद्योग व त्यासाठी शीतगृह त्याचबरोबर संपूर्ण किनारपट्टीवर पर्यटनपुरक व्यवसाय अशा विविध माध्यमातून कोकणचा विकास साधला जाऊ शकतो. मात्र निसर्गाच्या विरोधात असलेल्या विकासाबद्दल लोकांना काय सांगण्यात आलयं? याबाबत त्यांचं काय मत आहे? अशा अनेक प्रश्नांबरोबरच येथील जल, जंगल, संपत्ती पर्यायाने निसर्गाचं संवर्धन आणि जनजागृतीसाठी चिपळूण येथील आशुतोष जोशी या ध्येयवेड्या तरुणाने रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंत होणार्या 498 किलोमीटरच्या सागरी महामार्गाच्या पदयात्रेला अलिबागमधील रेवस येथून सुरुवात केली आहे. या प्रस्तावित सागरी महामार्गाच्या किनारपट्टीवरील गावांना भेट देत गावकर्यांचीत मतं जाणून येथील निसर्गाच्या विरोधात असलेल्या विकासाचं खरं मूल्य समजावून सांगण्याचा तो प्रयत्न करीत आहे.इंग्लंडमध्ये पदवी शिक्षण पूर्ण करणार्या आशूतोषने आपल्या गावातच स्थायिक होऊन कोकण भूमीच्या निसर्गाचं जतन, संवर्धन अशा जनजागृतीच्या कार्याला वाहून घेतलं आहे. याआधी चिपळूण ते विशाखापट्टणम अशी एक हजार आठशे किलोमीटरची पदयात्रा 67 दिवसांत पूर्ण करुन या पदयात्रेतील अनुभवावर आधारित ‘जर्नी टू द इस्ट’ हे पुस्तक त्याने लिहलं आहे.
प्रगतीचं मोजमाप महामार्गांच्या किंवा कारखान्यांच्या संख्येवरून न करता आपल्या नद्यांचं आरोग्य,आपल्या जंगलांचं चैतन्य आणि येथील विविध समाजाच्या लोकांतील काटकपणा यावरुन केलं तर? शाश्वत विकासाचा कच्चा आराखडा कोकण किनारपट्टीकडे आहेच.तिथल्या नैसर्गिक सौंदर्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं जतन करून आपण निसर्ग-पर्यटनास प्रोत्साहन देऊ शकतो,त्यामुळे पर्यावरणाची अधिक काळजी घेतली जाऊन लोकांना उपजीविकाही मिळेल.निसर्गाचा बळी देऊन माणसाची भरभराट होणार नाही तर निसर्गाशी सुसंवाद साधूनच ती होईल.
आशुतोष जोशी






