सिग्नल बसविण्याची शेकापची मागणी
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथे अपघाताचे तसेच वाहतूक कोंडीच्या प्रमाणात वाढ होत आहेत. त्यामुळे भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी दास्तान फाटा येथे सिग्नल बसविण्यात यावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा अध्यक्ष मयूर सुतार यांनी वाहतूक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तिरुपती काकडे यांच्याकडे केली आहे. या मागणीला काकडे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला आहे.
उरण तालुक्यातील दास्तान फाटा, जासई पुलाजवळ आणि परिसरात आतापर्यंत एकूण 17 अपघात झाले आहेत. त्यापैकी काही किरकोळ तर काही गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. तसेच, काही जणांना मृत्यूला देखील समोर जावे लागले आहे. तसेच, याठिकाणी वाहतुककोंडीची समस्या देखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी दास्तान फाटा येथे सिग्नल बसविणे गरजेचे असल्याचे स्थानिकांसह प्रवासी वर्गातून बोलले जात आहे. दरम्यान याबाबतची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा अध्यक्ष मयूर सुतार यांनी वाहतूक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तिरुपती काकडे यांच्याकडे केली आहे.
भविष्यात जेएनपीटी नोडदेखील नव्याने होणार आहे. अशावेळी रहदारी देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कोणत्याही निष्पाप लोकांचे जीव धोक्यात जाऊ नये, कोणाचेही अपघात होऊ नये, म्हणून यावर लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन डीसीपी तिरुपती काकडे यांनी मयूर सुतार यांना दिले आहेत. तसेच, मयूर सुतार यांनी जेएनपीटी व्यवस्थापक मनीषा जाधव यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनीही या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर ही बाब जेएनपीटीचे मुख्य महा प्रबंधक डॉ. जी वैद्यनाथन यांच्याही निदर्शनास आणून दिली असता त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.







