काशीद समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन पर्यटकांना जीवदान
|रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यामुळे बुधवारी (दि.29) काशीद समुद्रकिनारी एक मोठा अनर्थ टळला. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या डोंबिवली येथील दोन पर्यटकांना ‘रिमोट ऑपरेटिंग बोया’च्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. फुरकन शेख (२८) आणि कैफ शेख (२२) अशी या वाचवलेल्या पर्यटकांची नावे असून, हे दोघेही सध्या सुस्थितीत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवलीहून आलेले हे पर्यटक काशीद बीचवर पर्यटनासाठी आले होते. समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना अचानक दोघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल रोटकर आणि जीवरक्षक शिवम लाड यांनी तत्परता दाखवत परिस्थिती हाताळली.
अत्याधुनिक ‘रिमोट ऑपरेटिंग बोया’चा वापर या बचावकार्यात करण्यात आला. या उपकरणाच्या अचूक वापरामुळे जीवरक्षकांना बुडणाऱ्या पर्यटकांपर्यंत वेगाने पोहोचणे शक्य झाले आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त झालेल्या निधीतून नुकतेच १२ एप्रिल २०२६ रोजी नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर या वर्दळीच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी या रिमोट ऑपरेटिंग बोयांचे वाटप करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीमुळे उपलब्ध करून देण्यात आलेले हे तंत्रज्ञान पहिल्याच काही दिवसांत दोन व्यक्तींचे प्राण वाचवण्यासाठी मैलाचा दगड ठरले आहे. या यशस्वी बचावकार्यानंतर दोन्ही पर्यटकांना त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने पुढील वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संकटसमयी पोलिसांनी आणि स्थानिक जीवरक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





