जिल्हाधिकाऱ्यांना शेकाप शिष्टमंडळाचे निवेदन
| रायगड जिल्हा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत जोरदार पाऊस पडला. या वादळी पावसामुळे भात पिकांसह बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले. अलिबाग तालुक्यातील सुमारे पाच हजारहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे. हजारो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या, अशी मागणी शेकाप तालुका शेतकरी सभेच्या वतीने करण्यात आली. शेतकरी सभेचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह शेकापच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची मंगळवारी (दि.30) भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
अलिबाग तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भातपीकांचे तसेच बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. तयार झालेली पिके वादळी वाऱ्यामुळे आडवी पडली आहेत. संपूर्ण शेतीचा भाग जलमय झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
शेतकरी कामगार पक्षाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत आवाज उठविला आहे. शेकाप अलिबाग तालुका शेतकरी सभा अध्यक्ष अनिल गोमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप शिष्ट मंडळाने अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे यांची मंगळवारी (दि. 30) भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन आठ दिवसात पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या, अशी मागणी केली आहे. अन्यथा शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, रायगड जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या अतिवृष्टीमध्ये खारेपाट विभागातील भातशेतीचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. उथळी व गोडी जमिनीतील भात पिकालादेखील मोठा फटका बसला आहे. सुमारे पाच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाल्याची माहिती अनिल पाटील पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रशासनाने हालचाल सुरु करावी, अशी मागणी यावेळी केली. यावेळी अनिल पाटील, नरेश गोंधळी, उदय वेळे, सुर्यकांत म्हात्रे, प्रदिप पाटील, रविंद्र पाटील, मोतीराम पाटील, विनोद पाटील, आदी शेकाप पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित हेोते.






