श्रीलंकेत 46 जणांचा बळी; आयएमडीकडून हाय अलर्ट जारी
| मुंबई | प्रतिनिधी |
बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाने श्रीलंकेत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकले असून, आयएमडीकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चक्रीवादळ सेन्यारनंतर आता पुन्हा एक नवे संकट देशावर घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये ‘डिटवाह’ नावाचे महाभयंकर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाने श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. यमन या देशाने या चक्रीवादळाला ‘डिटवाह’ हे नाव दिले आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत हाहाकार उडाला असून, हे चक्रीवादळ आता हळुहळु भारताकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला असून काही राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ‘डिटवाह’ या चक्रीवादळाने श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. गेल्या 24 तासांमध्ये श्रीलंकेमध्ये तब्बल 300 मिलिमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला आहे. अतिमुसळधार पावसामुळे देशातील अनेक ठिकाणी लँडस्लाइडच्या घटना घडल्या आहेत. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा पूर्व आणि मध्य श्रीलंकेला बसला आहे. आतापर्यंत या पावसामुळे तब्बल 46 लोकांचा मृत्यू झाला असून, 23 जण बेपत्ता आहेत, बेपत्ता असलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. आता हे चक्रीवादळ भारताकडे सरकले असून, या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक विमानांची उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता पुढील 12 तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी वेगवान होणार असून, पुढे सरकरणार आहे. या चक्रीवादळाचा भारतासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.
भारतामधील ‘या' राज्यांना हाय अलर्ट
चक्रीवादळ डिटवाह हे आता भारताकडे सरकले असून, या पार्श्वभूमीवर आयएमडी कडून चक्रीवादळापूर्वीचा इशारा जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा कर्नाटक आणि केरळ या राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, 30 नोव्हेंबरपर्यंत या राज्यांमध्ये हवामान अतिशय खराब राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्राला किती धोका?
दरम्यान, या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका हा भारताच्या दक्षिणेकडील राज्यांना आहे. मात्र, महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहणार असून, सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.







