आठ तालुक्यातील 45 हजार नागरिक तहानलेले
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यातील अलिबागसह आठ तालुक्यातील 31 गावे आणि 131 वाड्यांमधील 45 हजार नागरिक तहानलेले असून, पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. धरणांमधील जलसाठा कमी झाल्याने या गावांमध्ये टँकरमार्फत पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जलजीवनच्या शेकडो योजना अपुर्ण राहिल्याने पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची साधारणतः लोकसंख्या 16 लाख 64 हजार आहे. दोन हजारहून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. या गावांमध्ये प्रति 55 लिटर माणसी पाण्यासाठी जलजीवनची योजना राबविण्यात आली. एकाच ठेकेदाराकडे पाच ते दहा योजनांची कामे देण्यात आली. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे जलजीवनचे काम अपुर्ण स्थितीत राहिले. घरासमोर नवीन नळ कनेक्शन बसविण्यात आले. नागरिक सुखावून गेले होते. महिला ही आनंदी झाल्या होत्या. डोक्यावरील हंडा उतरणार अशी अपेक्षा होती. परंतु, आशा पूर्णतः खोटी ठरली. ही योजनाही फेल ठरल्याची प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे. करोडो रुपये खर्च करून गावागावात दोन वर्षापुर्वी जलजीवनची योजना सुरु करण्यात आली. मात्र, आजही शेकडो योजनांची कामे प्रलंबित आहेत. पाईप बसविण्यात आले आहेत, तर पाण्याची टाकी नाही. योजनांची कामे पूर्ण आहेत, तर नळाला पाणी नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.पावसाळा सुरु होईपर्यंत धरणांमध्ये पाणी शिल्लक राहवे, यासाठी अनेक गावांमध्ये दोन ते तीन दिवस आड पाणी पुरवठा केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल सुरु झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, महाड, श्रीवर्धन, माणगांव या आठ तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ प्रचंड वाढला आहे. 31 गावे, 131 वाड्यांमधील 45 हजार 99 नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून 36 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे.
शासकीय टँकर गायब
रायगड जिल्ह्यामध्ये पूर्वी शासकीय टँकर उपलब्ध होते. या शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षापासून शासकीय टँकरची जागा खासगी टँकरने घेतली आहे. या खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय टँकर गायब झाले आहेत. मात्र, त्या जागी नवीन टँकर आणण्यास ही यंत्रणा उदासीन ठरली असल्याचे दिसून येत आहे.
गावे, वाड्यांवर दृष्टीक्षेप
| तालुके | गावे | वाड्या | लोकसंख्या | टँकर्स |
| अलिबाग | 03 | 00 | 6479 | 02 |
| पनवेल | 03 | 020 | 5617 | 04 |
| कर्जत | 02 | 03 | 2660 | 04 |
| खालापूर | 04 | 09 | 6334 | 05 |
| पेण | 05 | 56 | 17099 | 12 |
| महाड | 12 | 57 | 5061 | 07 |
| श्रीवर्धन | 01 | 02 | 1335 | 01 |
| माणगाव | 01 | 02 | 484 | 01 |
| एकूण | 31 | 131 | 45099 | 36 |





