सर्व जुन्या झाडांची कत्तल; पक्षांचा निवारा हिरावला
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील स्वातंत्र्यसैनिक डॉ. पै यांची नेरळ विद्या मंदिर शाळेच्या बाजूला असलेली पै वाडी ओसाड झाली आहे. त्या ठिकाणी असलेली सर्व जुनी झाडे जमीन मालकाने तोडून टाकली आहेत. दरम्यान, ती झाडे परवानगी घेऊन तोडली असल्याचे वन खात्याचे म्हणणे आहे. तसेच, त्या जमिनीवर नवीन झाडे लावली जाणार असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे. परंतु, हजारो पक्षांचे निवारा असलेली झाडे तोडल्याने मोठा अनर्थ घडला आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून, वन विभागाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात.
नेरळ येथील रेल्वे मार्गाला लागून असलेल्या स्वातंत्र्य सैनिक डॉ. पै यांच्या वाडीमधील झाडांवर हजारोंच्या संख्येने वटवाघूळ लटकलेले असत. सकाळ झाली की, ते वटवाघुळ पुन्हा अन्न शोधण्यासाठी झाडांपासून बाजूला होत सैर करायचे. त्यामुळे नेरळ विद्या मंदिर शाळेच्या बाजूला असलेली पै वाडी ही शेकडो वर्षे जुन्या झाडांची वाडी म्हणूनच ओळखली जायची. मात्र, मागील काही वर्षे नेरळ गावातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पै वाडीची विक्री होणार, असे बोलले जात होते. सव्वातीन एकराचा हा महत्वाचा जमिनीचा तुकडा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार विशेष प्रयत्न करीत होते. शेवटी या भूखंडाचा विकास करण्यासाठी सर्वात महत्त्वाची अडचण ही येथील झाडे बनली होती. तब्बल 100 फूट उंचीची आणि जुनी झाडे ही जमिनीच्या विक्रीत अडथळा ठरत होती.
मागील काही दिवसांत वन विभागाची परवानगी घेऊन पै वाडीमधील बहुसंख्य म्हणून शंभरहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तेथे असलेल्या झाडांचे बुंधे हे दोन व्यक्तीच्या कवेत मावतील अशी मोठी होती. अशा सर्व झाडांची कत्तल झाली असून, वन विभागाने वटवाघूळ या पक्षाचा निवास आणि निवारा असलेली सर्व झाडे तोडण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न मानवाधिकार कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. वन विभागाने ही झाडे तोडण्याची कार्यवाही केल्याने वन विभागाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे. वटवाघूळ हा काहीसा दुर्मिळ होत चाललेला पक्षी नेरळमधून हद्दपार करण्याची महत्वाची भूमिका वन विभागाने येथील झाडे तोडण्यास परवानगी दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, वन विभाग माध्यमांशी बोलताना पै वाडीचे जमीन मालकाची बाजू घेताना दिसत आहेत. तेथे संबंधित जमीन मालक नवीन झाडे लावणार असल्याचे वनपाल सांगत आहेत. ही बाब संशयास्पद असून नेरळ गावातील तीन एकरातील जुन्या झाडांचा समूह जमीनदोस्त झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, पडद्यामागून तेथे इमारती उभ्या राहणार असल्याचे जाहीरपणे स्थानिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे पै वाडी झाडांच्या तोडल्याने ओसाड झाली आहे.







